शेततळ्यात बुडून मायलेकीचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना नगर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी घडली. श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील पानसरे वस्तीवरील मायलेकीचा मृत्यू सोमवारी मृत्यू झाला.
कमल बापू पानसरे (वय ३६), वर्षा बापू पानसरे (वय १६) अशी त्यांची नावे आहेत. या मायलेकीचा दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जनावरांना पाणी काढण्यासाठी गेल्या असता शेततळ्यात पडून मृत्यू झाला. याबाबत बेलवंडी पोलिस स्टेशनला दिलीप पानसरे यांनी माहिती दिली. घारगाव येथील पानसरे वस्तीवर राहणाऱ्या कमल त्यांची मुलगी वर्षासोबत गाईला पाणी पाजण्यासाठी घरापासून काही अंतरावर शेतात असणाऱ्या शेततळ्यावर गेल्या होत्या. वर्षा पाणी काढण्यासाठी शेततळ्यात उतरली, तेव्हा प्लास्टिकच्या कागदावरून पाय घसरून ती शेततळ्याच्या पाण्यात पडली. शेततळ्याच्या दाव्याच्या मदतीने तिने बाहेर येण्याचा प्रयत्न केला, मात्र दावे तुटले. त्यामुळे वर्षाची आई कमल यांनी साडीच्या साह्याने वर्षाला वाचवण्याचे प्रयत्न केले; परंतु लेकीला वाचवताना आईही पाण्यात पडली आणि त्यात दोघींचाही बुडून मृत्यू झाला.
