भारतात कोणाची सत्ता? जाणून घ्या काय म्हणतेय पाकिस्तानची जनता

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा सुरु आहे ती म्हणजे निवडणुकींच्या निकालांची. लोकसभा निवडणूक २०१९ च्या निकालांची उत्सुकता फक्त भारतातच न्हे तर जगाच्या राजकीय पटलावरही पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे. एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर सर्वत्र भाजपाचं सरकारच पुन्हा सत्तेत येण्याचे अंदाज वर्तवण्यात आले. परिणामी पंतप्रधानपदावर पुन्हा एकदा मोदीच येणार, असा सूरही मोदी समर्थकांनी आळवला. पण, पाकिस्तानमध्ये मात्र मोदीविरोधी सूर आळवण्यास सुरुवात झाली आहे.

पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर अनेकांनीच मोदी आणि भाजपविरोधी सूर आळवला आहे. काही दिवसांपूर्वी पुलवामा हल्ल्याचं उत्तर म्हणून भारताकडून पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकमुळे हा सूर आळवला जात असल्याचं चित्र सध्या शेजारी राष्ट्रात पाहायला मिळत आहे.

‘ते पुन्हा सत्तेत येता कामा नये, त्यांनी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक हल्ले घडवून आणले’, असं कोणी म्हणत आहे, तर ‘माझ्या मते मोदी निव़डून येणारच नाहीत. त्यांना या निवडणुकांमध्ये मोठा फटका बसणार हे अटळ आहे’, अशा प्रतिक्रिया पाकिस्तानधील नागरिक देत आहेत. काही नागरिक मात्र भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील नात्यांमध्ये सुधारणा होण्यासाठी पुन्हा मोदींचीच सत्ता यावी अशाही प्रतिक्रिया देत आहेत. ज्यामुळे पाकिस्तानी सीमेतून होणाऱ्या दहशतवादी कारवाया आणि त्यांचं पाकिस्तानच्या सरकारवर असणारा दबाव कमी होईल हे सकारात्मक मुद्दे अधोरेखित केले जात आहेत.

शेजारी राष्ट्रात मोदींविषयी सुरु असणाऱ्या चर्चा आता निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतरच शमणार आहेत. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकांच्या निकालावरच अनेकांचं लक्ष लागलेलं आहे असं म्हणावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *