१ जूनपासून मासेमारी बंदी

पावसाळ्यात मासे व अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने १ जून ते ३१ जुलै २०१९ या कालावधीत राज्याच्या सागरी क्षेत्रात यांत्रिक नौकांद्वारे होणाऱ्या मासेमारीवर बंदी जाहीर करण्यात आली आहे. ही बंदी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगरयांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही, असा आदेश राज्याच्या मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाने जारी केला आहे.

जून आणि जुलै महिन्यातील मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेला वाव मिळून मत्स्यसाठ्याचे जतन होते. खराब आणि वादळी हवामानामुळे मच्छिमारांची जीवित व वित्तहानी टाळणेही त्यामुळे शक्य होते. त्यामुळे सागर किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापर्यंत या राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये यांत्रिक नौकांना मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. बंदी कालावधीमध्ये मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार गलबत आणि त्यात पकडण्यात आलेली मासळी जप्त करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

बंदी काळात मासेमारी करताना यांत्रिक नौकेस अपघात झाल्यास शासनाकडून कोणतीही नुकसानभरपाई मिळणार नाही. मच्छिमार सहकारी संस्थांच्या नौका मासेमारी करताना आढळल्या तर अशा संस्थांनी पुरस्कृत केलेले अर्ज राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेच्या लाभासाठी विचारात घेतले जाणार नाहीत, असेही मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *