कौमार्य चाचणीला विरोध; कुटुंबावर बहिष्कार

कौमार्य चाचणीला विरोध केल्यानं कंजारभाट समाजातील एका कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे. पीडित कुटुंबानं तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सरपंचासह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जात पंचायतीनं गेल्या वर्षभरापासून आमच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला आहे, असं विवेक तमायचीकर या तरुणानं सांगितलं. विवेकनं लग्नानंतर पत्नीची कौमार्य चाचणी करण्यास विरोध केला होता. त्यामुळं त्याच्या कुटुंबाला जातपंचायतीनं वाळीत टाकलं. इतकंच नव्हे तर सोमवारी विवेकच्या आजीचं निधन झालं. त्यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेला समाजातील लोकांनी जाऊ नये, असे फर्मानही जातपंचायतीनं सोडले. याबाबत विवेकनं अंबरनाथ पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी कंजारभाट जातपंचायतीचे सरपंच संगम गारुंगेसह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक केली नसल्याचं समजतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *