एक्सप्रेसमध्ये विसरलेली दागिन्यांची बॅग मिळाली

रेल्वेत एखादी हरवलेली किंवा विसरलेली वस्तू पुन्हा मिळणे दुरापास्त असते. मात्र ठाण्यात रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेमुळे तुतारी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या मुंबईतील एका कुटुंबाची दागिन्यांची बॅग तत्काळ मिळाली असून या बॅगेत दागिन्याबरोबर इतरही काही वस्तू होत्या. त्यामुळे या कुटुंबाच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद ओसांडून वाहू लागला.

मुंबईतील चेंबूर येथील शेळके कुटुंब लग्नानिमित्त कोकणात गेले होते. पुन्हा मुंबईला परतण्यासाठी छाया शेळके आणि त्यांनी त्यांचे आई-वडील यांनी बुधवारी रात्री वैभववाडी येथून तुतारी एक्सप्रेस पकडली. गुरुवारी पहाटे पनवेल रेल्वे स्थानकात उतरले. मात्र घाईगडबडीत एक बॅग एक्सप्रेसमध्येच विसरले. ही गोष्ट एक्सप्रेस सुटल्यानंतर शेळके कुटुंबाच्या लक्षात आले. तत्काळ पनवेल रेल्वे स्थानकातील प्रबंधक कार्यालयात धाव घेत बॅगेबाबतची माहिती दिली. या कार्यालयाने ही माहिती ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयाला दिली. तोपर्यंत तुतारी एक्सप्रेस ठाणे रेल्वे स्थानकात आली होती. संबंधित बोगीची तपासणी केल्यानंतर बॅग बोगीतच सापडली. शेळके यांना आपली बॅग मिळाल्याचे कळताच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. या बॅगेत एक नेकलेस, दोन बांगड्या, दोन अंगठ्या असा सुमारे दोन लाखांचा सोन्याचे दागिने तसेच अन्य काही वस्तू होत्या. ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयात धाव घेतलेल्या शेळके यांना रेल्वे प्रशासनाने बॅग स्वाधीन केली. अशाप्रकारे रेल्वे प्रशासनाच्या जागरूकतेमुळे अवघ्या काही तासात विसरलेली बॅग परत मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *