पावसासाठी मांसाहारबंदी; ग्रामपंचायतीचा निर्णय

पुरोगामी विचारसरणीचा वारसा सांगणाऱ्या, अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कार्यात जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या व मागील काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळात होरपळत असलेल्या तालुक्यातील कान्हूर पठार गावाने यावर्षी चांगल्या पावसासाठी मासांहारबंदीचा निर्णय घेतला आहे. चांगला पाऊस पडावा यासाठी ११ ते २५ मे या कल्याण कृतिका नक्षत्राच्या कालावधीत ग्रामस्थांनी मांसाहार न करण्याची सूचना ग्रामपंचायतीच्या फलकावर सरपंच व सदस्यांच्या नावाने लिहिण्यात आली आहे. विशेष म्हणजे गावात या सूचनेची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

दिवंगत माजी आमदार कॉ बाबासाहेब ठुबे यांची कर्मभूमी असलेल्या कान्हूर पठार गावाने जिल्ह्याला पुरोगामी विचारांचा वारसा दिला आहे. मात्र, दुष्काळामुळे गावाची अवस्था बिकट झाली आहे. मागील काही वर्षांपासून कान्हूर पठारला टँकरचे पाणीही मिळेनासे झाले आहे. पाणीटंचाईमुळे यावर्षी समाधानकारक पाऊस पडावा, अशी प्रत्येकाची भावना आहे. गावात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी काही व्यक्तींनी कल्याण कृतिका नक्षत्रात मांसाहार केला नाही, पशुहत्या झाली नाही तर गावात पाऊस पडेल, असे सांगितले होते. सरपंच गोकुळ काकडे यांना याबाबतची कल्पना देण्यात आली. लोकभावनेचा आदर करून त्यांनीही या सूचनेस होकार दिला. त्यानंतर लगेचच ग्रामपंचायतीच्या फलकावर तशी सूचना लिहिण्यात आली. त्यामुळे मागील चार-पाच दिवसांपासून गावात मांसविक्री करणारी दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

या प्रकाराबाबत पुरोगामी विचारधारा असणाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरून या प्रकारावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. मांसाहार बंद करण्यापेक्षा जलयुक्त शिवार योजना, जलसंधारण, वृक्षारोपन असे पर्यावरणपूरक उपक्रम राबवले तर पाऊस पडण्यास मदत होईल. भविष्याचा वेध घेत पर्जन्यमान वाढवण्यासाठी जलसंधारण, जलसाक्षरता, पाणीबचतीचे कार्यक्रम राबवावेत. असे उपक्रम राबविण्याऐवजी अंधश्रद्धेच्या वाटेने जाणे अयोग्य असल्याच्या कानपिचक्याचीही सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *