आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रेयसीवर गुन्हा

प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराने आत्महत्या केल्याप्रकरणी प्रेयसीविरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नगर शहरातील माळीवाडा येथील सागर विलास कानडे याने पाच दिवसांपूर्वी राहत्या घरात आत्महत्या केली होती.

मंगळवारी सागरचे वडील विलास कानडे यांच्या फिर्यादीवरून प्रेयसी गौरी किसन जगताप (रा. निमगाव केकती, इंदापूर, पुणे) हिच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सागर कानडे याचे लग्न झालेले होते. त्याचे गौरी जगताप नावाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. गौरी जगताप हिने सागर कानडे याला वेळीवेळी फोन करून तू तुझ्या पत्नीस सोडून देऊन माझ्य़ा घरी राहाण्यास ये. तसेच मला पैसे दे, असे म्हणून वेळीवेळी ब्लॅकमेल केले. त्या तणावातून सागर कानडे याने २ मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सागर कानडे याने प्रेयसीच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवली होती. मोबाइलवरील मेसेजवरून प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून सागर कानडेने आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

मारहाणप्रकरणी पत्नीसह चौघांवर गुन्हा

लग्न झालेल्या असताना घरात महिलेबरोबर सापडलेल्या तरुणाला सासू, सासरे, पत्नी यांनी मारहाण केली. भिंगारमधील खळेवाडी येथे हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अभिषेक सुनील जाधव याच्या फिर्यादीवरून सासरे महादेव भीमराव वाघमारे, सासू मंगल महादेव वाघमारे, पत्नी अश्विनी अभिषेक जाधव, बापू भीमराव जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अभिषेक जाधव याचे लग्न झालेले आहे. परंतु, तो दुसऱ्या महिलेबरोबर राहत असल्याने त्याची पत्नी, सासू-सासराने भिंगारला त्याच्या घरी येऊन अभिषेक जाधव याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. महादेव वाघमारे याने चाकूने अभिषेक जाधवच्या गळ्यावर, पाठीवर, छातीवर मारून जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *