निनावी फोनमुळे लग्नात खोडा

लग्नासाठी उभ्या राहिलेल्या नवरदेवाला अज्ञात व्यक्तीने फोन करून लग्न न करण्याबाबत धमकावल्याने लग्न मोडल्याचा प्रकार कामोठेत उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर वधूच्या पित्याने लग्न मोडणाऱ्या तरुणाच्या कुटुंबियांविरोधात कामोठे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी लग्न मोडणाऱ्या तरुणासह त्याचे आई-वडील, बहिण, तिचा पती व मामा अशा सर्वांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

हरिष गायकवाड (२८), धोंडीराम गायकवाड (५६), शितल गायकवाड (५०), प्रतिभा जाधव (३५) स्वप्नील जाधव (४०), मामा कांबळे या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील हरिष गायकवाड व त्याच्यासोबत लग्न करणारी नियोजित वधु हे दोघेही कामोठे भागात राहण्यास आहेत. त्यामुळे या दोघांची मैत्री होऊन दीड वर्षे प्रेमसंबध सुरू होते. हा प्रकार तरुणीच्या घरी समजल्यानंतर त्यांनी या दोघांकडे विचारणा केली. दोघांनी एकमेकांवर प्रेम करत असल्याचे आपल्या कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांचे लग्न करण्याचे ठरविले. मात्र तरुणीच्या वडिलांची आर्थिक परिस्थीती चांगली नसल्याने लग्नाची तारीख निश्चित होऊ शकली नाही.

या दरम्यान, हरिष आणि तरुणी या दोघांमध्ये मोबाइलवर बोलणे सुरू होते. ४ मे रोजी लग्नाची तारीख निश्चित झाल्यानंतर तरुणीच्या वडिलांनी हॉल बुक केला. तसेच लग्नपत्रिकाही छापल्या.

दरम्यानच्या काळात तरुणीच्या मित्र परिवारातील एका तरुणाने हरिषला फोन करून तिच्यासोबत लग्न न करण्याबाबत सूचना केली. त्यामुळे हरिषच्या कुटुंबीयांनी ही माहिती तरुणीच्या आई-वडिलांना दिल्यानंतर त्यांनी फोन करणाऱ्या तरुणाकडे विचारणा केल्यानंतर त्याने दारूच्या नशेत फोन केल्याचे सांगून माफी मागितली. त्यानंतर अनोळखी व्यक्तीने हरिषच्या मोबाइलवर फोन करून तरुणीशी लग्न केल्यास महागात पडेल, अशी धमकी दिली. यानंतर हरिषने व त्याच्या कुटुंबीयांनी लग्न मोडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *