ठाण्यातील बी कॅबिन परिसरात ५० वर्ष जुनी तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना मंगळवारी पहाटे घडली. या घटनेत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सात रहिवासी जखमी झाले आहेत.
बी कॅबिन परिसरात कृष्ण निवास ही जुनी इमारत असून महापालिकेने या इमारतीला धोकादायक जाहीर केले होते. महापालिकेने नोटीस बजावल्यावर या इमारतीतील काही कुटुंब अन्यत्र स्थलांतरित झाले असले तरी पाच कुटुंबांनी ही इमारत सोडली नाही व ते इमारतीमध्ये राहत होते. मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास इमारत कोसळली. अग्निशमन दल व एनडीआरएफचे ५० जवान घटनास्थळी बचावकार्य करत असून ढिगा-याखाली आणखी काही जण अडकले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या १० दिवसात इमारत कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी ठाकुर्ली येथे इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला होता.
पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ठाणे व परिसरात क्लस्टर विकास योजनेची आवश्यकता असून सत्तेवर आल्यापासून शिवसेनेचे स्थानिक क्लस्टर विकास योजनेवर काहीच बोलत नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत
सुभाष भट (वय ५४), मीरा भट (वय ५८), रश्मी भट (वय २५), अरुण सावंत (वय ६२), प्रिया पटेल (११ वर्ष), भक्ती सावंत (वय ३०) कुमारी खोत (वय ७ वर्ष), रामचंद्र भट (वय ६२ वर्ष), मंदार नेने ( वय १७ वर्ष), रचिता भट (वय २५ लर्ष), अमित सावंत.

