रुग्णांना तत्काळ मदत मिळण्याच्या उद्देशाने सरकारने सुरू केलेल्या १०८ रुग्णवाहिकेच्या सेवेने मागील अडीच महिन्यात राज्यातील २ लाख ४१ हजार रुग्णांना नवसंजीवनी दिली आहे. त्यात १७ मार्चपर्यंत राज्यातील १ लाख ५८ हजार ६४३ रुग्णांवर किरकोळ कारणांसाठी औषधोपचार केले आहेत. तर प्रसूती आणि गर्भधारणेच्या काळात राज्यातील ४६ हजार ६० रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावे, या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय आरोय अभियानांतर्गत १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत आणली. ग्रामीण भागात आजही दळणवळणाच्या सोयी उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांना त्वरित जिल्हा रुग्णालयात किंवा शहरातील रुग्णालयात नेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेता शासनाने १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सुरू केली. तसेच मुंबई व राज्यातील पालघर, जव्हार, मोखाडा, नंदुरबार, मेळघाट अशा दुर्गम भागात सुरू झालेल्या बाइक अॅम्ब्युलन्सच्या सेवेचाही रुग्णांना लाभ मिळत आहे. मुंबई-ठाणे परिसरात या बाइक अॅम्ब्युलन्सनेही दोन महिन्यांत ३ हजार २११ रुग्णांना साहाय्य केले आहे.
नव्या वर्षाची आकडेवारी
आपत्कालीन स्थिती जानेवारी फेब्रुवारी मार्च (१७ तारखेपर्यंत) एकूण
रस्ते अपघात ६५०० ६३०८ ३५११ १६३१९
औषधोपचार ६८२८४ ५९५२३ ३०८३६ १५८६४३
प्रसूती/गर्भधारणा १८४०९ १७१८३ १०४६८ ४६०६०
पडणे २५०१ २२८७ १२६१ ६०४९
नशा/विषबाधा १९०१ १९९८ १३०६ ५२०५
अन्य २१०७ १७११ ८४४ ४६६२
