आंबेडकर सोलापुरातून लढणार

चित बहुजन आघाडीच्या राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर करताना अॅड. आंबेडकर यांनी अकोला आणि नागपूरच्या जागेविषयीचा सस्पेन्स कायम ठेवला. मधल्या काळात लक्ष्मण माने यांनी अॅड. आंबेडकर सोलापुरातून लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याविषयी अधिकृतरित्या सांगण्यात आले नाही. पण, अॅड. आंबेडकर हे सोलापुरातूनच लढणार असल्याचे शुक्रवारी त्यांचा मुलगा सुजात यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ‘अब की बार सोलापूर का खासदार, आंबेडकर का वारसदार,’ असा नाराही दिला.

अकोला लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक निवडणूक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांभोवती फिरत असते. अॅड. आंबेडकर हे नेमके कुठून लढणार हे निश्चित न झाल्याने काँग्रेसचा उमेदवारही ठरला नसल्याचे सांगण्यात येते. अॅड. आंबेडकर निवडणूक रिंगणात राहिल्याने काँग्रेसच्या मतांचे विभाजन होऊन भाजपला लाभ झाला. भाजपचे खासदार संजय धोत्रे यांच्या मागील तीन विजयामागे हेच सूत्र होते. वंचित आघाडीशी आघाडीची शक्यता मावळल्यानंतर काँग्रेसने उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. दोन महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये आलेल्या डॉ. अभय पाटील यांच्या नावावर एकमत करण्यात आले. पण, त्यांचे वडील संघात होते, अशी चर्चा पसरल्याने मुस्लीम समाजाने त्यांच्या नावाला विरोध दर्शविला. दोन दिवसातच हे नाव पुन्हा मागे पडल्याने नव्यांची चर्चा सुरू झाली आहे. अभय पाटील यांना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडून मदत मिळण्याचीही शक्यता व्यक्त होत होती. धोत्रे आणि पाटील अशा दोन गटात भाजप विभागले आहे. धोत्रे नकोत म्हणून डॉ. पाटील यांच्यासाठी ते उभे राहणार असल्याचेही सांगण्यात येत होते. दरम्यान, काँग्रेसला याची जाणीव झाल्याने त्यांनी अधिकृत घोषणा थांबविली. आता काँग्रेसकडून मुस्लीम उमेदवार दिला जाणार असल्याची चर्चा आहे. हिदायत पटेल किंवा माजी मंत्री अजहर हुसेन यांचे चिरंजीव डॉ. जिशान हुसैन यांचा विचार होण्याची शक्यता आहे. यापूर्वी खान मोहम्मद असगर हुसेन व मोहम्मद मोहीबुल हक हे दोन मुस्लिम खासदार अकोला मतदारसंघाने दिले आहेत.

युती असूनही बीड व अकोला या दोन लोकसभा मतदारसंघात भाजपला मदत करणार नाही, अशी अट शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी घातली आहे. त्यामुळे शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील हे खा. संजय धोत्रे यांच्या विरोधात काम करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय आप, बसप, मनसे हे पक्षसुद्धा भाजपसाठी तापदायक ठरण्याचा धोका व्यक्त होत आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांच्यावतीने प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी १९ मार्चला नामाकंन घेतला आहे. त्यामुळे प्रा. अंजली आंबेडकर अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार असतील, अशी चर्चा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मात्र आपल्याव्यतिरीक्त कुटुंबातील कुणीही निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले होते, हे विशेष.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *