आई-मुलाच्या मानलेल्या नात्यास आक्षेप; मुलाचा खून

आई-मुलाच्या मानलेल्या नात्यास आक्षेप घेऊन मानलेल्या मुलाला वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने बोलावून धारदार शस्त्राने वार करून आणि डोक्‍यात दगड घालून खून केल्याची घटना खडकी येथे घडली. या प्रकरणात दोन महिलांसह पाच जणांना गुन्हे शाखा युनिट-चारच्या पोलिसांनी आठ तासात जेरबंद केले.

रेकॉर्डवरील गुन्हेगार राजेश राजू स्वामी, सागर अशोक उंबरकर (दोघांचे वय २४, रा. खडकी), धीरज गोपाळ गवळी (वय २४, रा. खडकी बाजार), रेणूका परदेशी आणि राधा राजू स्वामी अशी अटक केलेल्यांची नावे आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लष्कर अधिकाऱ्यांच्या स्टाफसाठी दिलेल्या बंगल्यात ही घटना घडली. गोपाळ अर्जुन कांबळे (वय २९) असे  तरुणाचे नाव आहे. त्याच्या आईने या प्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गोपाळ हा फिर्यादी यांचा मानलेला मुलगा आहे. फिर्यादी यांचा भाचा सागर उंबरकर याचा या मानलेल्या नात्यास विरोध होता. त्यावरून सागर, गोपाळ आणि नातेवाईक यांच्यात सतत भांडणे होत होती. बुधवारी किरकोळ कारणावरून राधा स्वामी व रेणूका परदेशी आणि फिर्यादी व मयत यांच्यात वाद झाला होता. त्याची माहिती उंबरकरला मिळाली. त्यानंतर मेहुणा राजेश स्वामी, त्याची बहिण राधा स्वामी, मित्र धीरज गवळी आणि अन्य एका महिलेने संगनमत करून, वाढदिवस साजरा करण्याच्या आणि दारू पिण्याच्या बहाण्याने गोपाळला बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी गोपाळचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

पळून जाण्याच्या तयारीतील आरोपींना अटक

गुन्हा केल्यानंतर सर्व आरोपी चिंचवड येथून बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत होते. पोलिस आरोपींचा शोध घेत असताना, त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चिंचवडला जाऊन पाच जणांना अटक केली. खडकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अंजूम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गणेश पवार, हवालदार राजू मचे, गणेश काळे आणि विशाल शिर्के यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *