जम्मूमधील सीमावर्ती भागात अतिदक्षतेचा इशारा

पाककडून मंगळवारी रात्रभर सुरू असलेला तोफांचा मारा आणि बुधवारी सकाळी पाकिस्तानने भारताच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केल्यानंतर जम्मू येथील सीमावर्ती भागात लष्कर, सीमा सुरक्षा दलाला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तोफांचा मारा बुधवारी थांबविण्यात आला आहे.

भारताने मंगळवारी पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील जैश-ए-महंमद येथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने मंगळवारी रात्रभार ताबारेषेवरील भारतीय चौक्यांना लक्ष्य केले. त्यात पाच जवान किरकोळ जखमी झाले. त्यानंतर भारतीय हवाई हद्दीचा पाकिस्तानने भंग केला. त्यामुळे या भागामध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. राजौरी आणि पूँछ जिल्ह्यातील ताबारेषेपासून पाच किलोमीटरच्या अंतरावरील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. नागरिकांनी घरात थांबावे, बाहेर पडू नये, असे सांगण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले, की जम्मू, राजौरी आणि पूँच जिल्ह्यातील ताबारेषेजवळच्या भागात मंगळवारी रात्रभर पाकिस्तानकडून तोफांचा मारा आणि गोळीबार करण्यात आला. भारतीय लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात पाच पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. त्यात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी सैनिक ठार झाले. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर आणि बीएसएफला ताबारेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. काही नागरिक या ठिकाणाहून दुसरीकडे विस्थापित झाले आहेत. ‘जम्मू-काश्मीर भागात पूँच आणि नौशेरा भागात पाकिस्तानने भारताच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले. मात्र, भारताच्या लढाऊ विमानांनी त्यांना माघारी धाडले,’ असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले, तर पाकिस्तानने बुधवारी स्वसंरक्षणार्थ ताबारेषेचे उल्लंघन करून हल्ला केल्याचा कांगावा केला.

बडगाममध्ये हेलिकॉप्टर कोसळले

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये बडगाम जिल्ह्यात हवाई दलाचे एम-१७ हेलिकॉप्टर कोसळून बुधवारी सहा जणांचा मृत्यू झाला. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. बडगाममधील गारेंड कलान गावातील मोकळ्या जागेत सकाळी दहा वाजता हेलिकॉप्टर कोसळले. घटनास्थळावर सहा जणांचे मृतदेह आढळले. त्यातील एकाची ओळख पटली असून किफायत हुसेन असे मृत नागरिकाचे नाव आहे. ते स्थानिक रहिवासी होते. इतर चार हवाई दलाचे जवान असण्याची शक्यता आहे. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्याला आग लागली.

विमानतळ सुरूच राहणार

नवी दिल्ली : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) बुधवारी सकाळी बंद केलेले नऊ विमानतळ तूर्तास सुरू राहणार असल्याचे स्पष्टीकरण नागरी उड्डाण महासंचालनालयाने दिले आहे. भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर श्रीनगर, जम्मू, लेह, पठाणकोट, अमृतसर, शिमला, कांग्रा, कुलूमनाली आणि पित्तोडगड येथील विमानतळ बुधवारी सकाळी बंद केले होते.

उरी भागात तोफांचा मारा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये उरी भागात पाकिस्तानने बुधवारी तोफांचा जोरदार मारा केला. भारतीय चौक्यांना पाकने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झालेली नाही. लष्कराने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिल्याची माहिती  दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *