‘२६/११चे पुरावे दिले होते, पाकिस्तानने काय केले?’

२६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्याचे पुरावेही तत्कालीन सरकारने पाकिस्तानला दिले होते. आमचं सरकार आल्यानंतर आम्हीही काही हल्ल्यांचे पुरावे दिले होते. पाकिस्ताननं आजवर त्याचं काय केलं,’ असा सणसणीत सवाल संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना केला आहे.

पुलवामा हल्ल्यासंदर्भात इम्रान खान यांनी काल जाहीर भाष्य केलं होतं. या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. भारताला तसं वाटत असल्यास त्यांनी पुरावे द्यावेत, आम्ही कारवाई करू,’ असं इम्रान खान म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा निर्मला सीतारामन यांनी जोरदार समाचार घेतला आहे. ‘मुंबईवर हल्ला झाला त्यामागे पाकिस्तानचाच हात होता. भारतानं त्यावेळी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्या होत्या. हल्ल्यातील पाकचा सहभाग दाखवणारे सर्व पुरावेही दिले होते. दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडलं. या प्रकरणाचा खटला भारतात चालवण्यात आला. कसाबला शिक्षा सुनावण्यात आली. पाकिस्तानच्या न्यायालयांनी या प्रकरणाची साधी दखल घेतली नाही,’ असा संताप सीतारामन यांनी व्यक्त केला.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी केली आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय राजकारणातही पाकिस्तानला एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्व बाजूंनी कोंडी करून नंतर पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं पाकिस्तानची पळापळ झाली असून पाकिस्तान हल्ल्याशी संबंध नाकारत असल्याचं बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *