नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून ज्येष्ठ विचारवंत, मानवी हक्क कार्यकर्ते डॉ. आनंद तेलतुंबडे यांना आज पुणे पोलिसांनी मुंबईत अटक केली. पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई विमानतळावरुन त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची विलेपार्ले पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. काल पुणे न्यायलयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. आज पुणे कोर्टात त्यांना हजर करण्यात येणार आहे. डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी अटक टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने त्यांना कनिष्ठ कोर्टातून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानंतर तेलतुंबडे यांनी पुणे कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. शुक्रवारी तेलतुंबडे यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. अखेर आज पहाटे पुणे पोलिसांनी मुंबई विमानतळावरून तेलतुंबडे यांना ताब्यात घेतले.
मागील वर्षी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा हिंसाचारामागे माओवादी आहेत आणि माओवाद्यांशी वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा संबंध आहे, अशा आरोपाखाली पुणे पोलिसांनी ऑगस्टमध्ये काहींवर अटकेची कारवाई केली होती. त्यात तेलतुंबडे यांचाही समावेश होता. दरम्यान, आनंद तेलतुंबडे यांना झालेल्या अटकेचा विरोध होऊ लागला आहे. माजी महाधिक्ता इंदिरा जयसिंग यांनी ही अटक म्हणजे सुप्रीम कोर्टाच्य निर्देशांची पायमल्ली असल्याचे म्हटले आहे. तर, तामिळ चित्रपट दिग्दर्शक पा रंजित, माकप नेत्या सुभाषिनी अली आदींनी अटकेचा निषेध केला आहे.