बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा अगदी तोंडावर आली असतानाच परीक्षा हॉल तिकीटांतील चुकांचा सावळागोंधळ समोर आला आहे.
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदा प्रथम online पद्धतीने हॉलतिकीट देण्यात आले मात्र या हॉलतिकिटांवर विद्यार्थ्याचे नाव, विषय, परीक्षा माध्यम याविषयी असंख्य चुका झाल्या आहेत. या चुकांच्या दुरुस्तीसाठी अभ्यास सोडून कॉलेजांत खेटे मारणाऱ्या विद्यार्थ्यांकडून काही कॉलेजे एका चुकीच्या दुरुस्तीसाठी ५० ते २०० रुपये घेत असल्याचे समोर आले आहे. अभ्यास अंतिम टप्प्यात असतानाच विद्यार्थ्यांचा बराचसा वेळ हॉलतिकिटावरील चुका दुरुस्त करण्यात वाया जात आहे. काही विद्यार्थ्यांच्या नावात चुका असून परीक्षेचे माध्यम, विषयांतही चुका आहेत. काही विद्यार्थ्यांची सही आणि फोटोही हॉलतिकिटावर दिसत नाही, अशा तक्रारी विद्यार्थी भारतीच्या कार्याध्यक्षा साक्षी भोईर, जितेश पाटील, सलोनी तोडकर, मंजिरी धुरी यांनी मुंबई विभागीय शिक्षण मंडळाकडे केल्या आहेत.
सर्व महाविद्यालयांना लेखी आदेश दिले असून दुरुस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊ नयेत, असे सर्व कॉलेजांना कळविले आहे. पैसे घेताना आढळल्यास कारवाई केली जाईल- शरद खंडागळे, सचिव, मुंबई विभागीय शिक्षण मंडळ.