शहिदांच्या कुटुंबीयांना आता मिळणार ५० लाखांची मदत

शहिदांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी मदत २५ लाखांवरून ५० लाख करण्यासह महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत भारतीय सैन्य दलातील महाराष्ट्रातील शौर्य तसेच सेवापदक विजेत्यांच्या अनुदानात दुप्पटीने वाढ केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी आज केली. अथर्व फाऊंडेशनच्यावतीने वन फार ऑल ॲण्ड ऑल फार वन उपक्रमांतर्गत आयोजित ‘अ ट्रिब्युट टू इंडियन आर्मी अँण्ड सॅल्यूट टू सोल्जर्स’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

अथर्व फाउंडेशनच्यावतीने लष्करातील दहा शहिदांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांच्यासह दोनवेळा महावीर चक्र विजेते ग्रुप कॅप्टन जगमोहन नाथ व परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर योगेंद्र यादव यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमस्थळी शालेय विद्यार्थ्यांसाठी लष्करी सामग्रीचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. वरळीस्थित एनएससीआय डोममध्ये झालेल्या कार्यक्रमात शहिद वीर जवानांच्या कुटुंबियांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी संपूर्ण सभागृहाने उभे राहून वीरांना मानवंदना दिली, तसेच ‘भारत माता की जय’ च्या घोषणा देण्यात आल्या.

शहिदांच्या कुटुंबीयांनी केलेल्या त्यागाला वंदन करण्याचा हा कौतुकास्पद उपक्रम आहे. हा केवळ त्यांचा नव्हे, तर देशाचा सन्मान आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले जवान चोवीस तास सज्ज असतात. वेळ आल्यास हे जवान आपल्या प्राणाचीही आहुती देतात. त्यामुळे अशा जवानांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावीच लागेल. याच भावनेतून साडे आठ लाख रुपये असलेली मदत गेल्या वर्षी २५ लाख रुपये करण्यात आली होती. यावर्षीपासून हीच मदत ५० लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहिदांच्या कुटुंबियांना जिल्ह्यातच दोन हेक्टर जमीन देणार असून, त्याचे अधिकार जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

आपल्या तीनही सेना दलातील सैनिक अतिशय प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या रक्षणासाठी सज्ज राहतात. प्रसंग आल्यास हौतात्म्यही पत्करतात. अंतर्गत नक्षलवाद असो, की सीमेवरील लढाई असो या सैनिकांचे योगदान विसरता येणार नाही. त्यामुळेच भारताची अखंडता आणि एकात्मता अबाधित आहे. स्वराज्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी त्याग केला आहे. त्यातून स्वराज्य निर्मिती झाली. आता या स्वराज्याला सुराज्याकडे नेण्याची जबाबदारी आहे. त्याच अनुषंगाने या शूरांच्या त्यागाप्रती कृतज्ञ रहावे लागेल. त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागालाही अभिवादन करावे लागेल. असे कार्यक्रम नव्या पिढीसाठी राष्ट्रभक्तीची ऊर्जा निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतील, असं मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.

अशोक चक्र, परमवीर चक्र विजेत्यांना देण्यात येणारी मदत १८ लाखांवरून ३६ लाख, महावीर चक्र, कीर्ती चक्र विजेत्यांची मदत १२ लाखांवरून २४ लाख, शौर्य चक्र, युद्ध सेवा आदी पदक विजेत्यांचा मदतीत ६ लाखांवरून १२ लाख तसेच अन्य सर्वच मदत दुप्पट करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *