देशाची आर्थिक राजधानी व सुरक्षित शहर अशी ओळख असलेल्या मुंबईत बलात्कार व खुनाचे गुन्हे वाढल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार, मुंबईत २०१७च्या तुलनेत मागील वर्षी बलात्कार व खुनाचे गुन्हे २१ टक्क्यांनी वाढले आहेत.
मुंबई पोलिसांनी अलीकडंच प्रसिद्ध केलेल्या गुन्हे अहवालातून ही माहिती पुढं आली आहे. त्यानुसार मुंबईत चोऱ्या आणि घरफोड्यांच्या घटनांत घट झाली आहे. मात्र, बलात्कार व खुनासारख्या गंभीर घटना वाढल्या आहेत. विशेषत: महिला व मुलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. २०१७ मध्ये बलात्काराच्या १,२१८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. त्यात २० टक्क्यांनी वाढ होऊन हा आकडा १,४५९ वर पोहोचला आहे. बलात्काराच्या या गुन्ह्यांमध्ये महिलांच्या विरोधातील ८८९ तर, लहान मुलांच्या विरोधातील ५७० घटनांचा समावेश आहे. हत्या व हत्येच्या प्रयत्नांच्या गुन्ह्यातही वाढ झाली आहे.
माजी पोलीस अधिकारी व संबंधित विषयातील जाणकारांच्या मते, गुन्हे नोंदवण्याच्या बाबतीत पोलिसांकडून मिळणारा तत्काळ प्रतिसाद यासाठी कारणीभूत आहे.
सायबर गुन्हे सुरूच!
नवनवे तंत्रज्ञान व तपासाचे विविध मार्ग उपलब्ध झाल्यानंतरही सायबर गुन्हे सुरूच आहेत. २०१७ व २०१८ या दोन्ही वर्षांतील सायबर गुन्ह्यांची आकडेवारी जवळपास सारखीच आहे. याउलट हे गुन्हे शोधून काढण्याचा वेग अतिशय कमी आहे. एकूण सायबर गुन्ह्यांपैकी केवळ १३ टक्के गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय.
