…म्हणून धर्मा पाटलांची पत्नी, मुलगा ताब्यात

संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात विषप्राषण करून आत्महत्या करणारे धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांचे हाल अजूनही सुरूच आहेत. धर्मा पाटील यांची पत्नी सखुबाई व मुलगा नरेंद्र पाटील यांना दोंडाईचा पोलिसांनी बुधवारी कोणत्याही कारणाशिवाय ताब्यात घेऊन डांबून अर्धा दिवस डांबून ठेवलं. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान आंदोलन करू नये म्हणून या मायलेकांना ताब्यात घेण्यात आल्याचं समोर आल्यानं संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी व सरकारनं याचा खुलासा करावा अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

‘चेतक फेस्टिव्हल’च्या निमित्तानं मुख्यमंत्री बुधवारी धुळे-नंदुरबारच्या दौऱ्यावर होते. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून बुधवारी सखुबाई व नरेंद्र पाटील यांना सकाळी सात वाजता विखरण येथून पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोरे आणि त्याचे सहकारी यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर दुपारपर्यंत त्यांना पोलीस ठाण्यातच बसवून ठेवले. त्यामुळं या दोघांनाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपाशी राहावे लागले.

खरंतर आपण कुठल्याही प्रकारचं अनुचित कृत्य करणार नाही, अशी लेखी हमी नरेंद्र पाटील यांनी पोलिसांना दिली होती. तरीदेखील त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळं त्यांनी संताप व्यक्त केला आहे. आपल्याला कोणत्या कारणासाठी ताब्यात घेतले याचा खुलासा पोलिसांनी करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही पोलिसांच्या या कृतीचा निषेध केला आहे. सरकारची ब्रिटिश मनोवृत्ती यातून दिसून येते, अशी टीका त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

शेतकरी नेते चंद्रकांत वानखेडे यांनीही पोलिसांच्या या कृतीचा निषेध करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. ‘मंत्रालयात आत्महत्या केलेला शेतकरी धर्मा पाटील याची पत्नी आणि मुलाला डांबून ठेवण्याचा प्रकार संतापजनक आहे. धर्मा पाटीलला हे सरकार न्याय देऊ शकले नाही. तो शेतकरी होता म्हणून त्याच्या कुटुंबीयांनाच गुन्हेगार ठरवून धोकादायक गृहीत धरणे घातक आहे. करून करून काय केलं असतं त्यांनी? सत्तेत बसलेली माणसे भयभीत आहेत. ते स्वत:च्या सावल्यांनाही घाबरत असल्याचं दिसतं,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *