‘राजीव गांधी यांचे ‘भारतरत्न’ काढून घ्या’

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना देण्यात आलेला ‘भारतरत्न’ हा किताब सन १९८४च्या शीखविरोधी दंगलीच्या मुद्द्यावरून काढून घेण्यात यावा, असा ठराव दिल्ली विधानसभेने शुक्रवारी मंजूर केला आहे. शीखविरोधी दंगल हा वंशसंहार होता, असेही या ठरावात म्हटले आहे.

आम आदमी पार्टीचे आमदार जर्नेल सिंग यांनी मांडलेला हा ठराव सभागृहात आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. देशाच्या राजधानीच्या इतिहासातील या सर्वात भीषण वंशसंहारातील पीडितांच्या कुटुंबीयांना अद्यापही न्याय मिळालेला नाही, हे दिल्ली सरकारने केंद्रीय गृहमंत्रालयाला कडक शब्दांत लेखी कळवावे, असे या ठरावात म्हटले आहे.

शीख दंगलीप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेले सज्जन कुमार यांनी नुकताच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *