अबब!!! तीन कोटी १० लाखांची नुकसान भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश

आपल्या हक्कांसाठी अनेकदा संघर्ष करावा लागतो. पण या सघंर्षाच फळ जर गोड मिळाले, तर कोणालाही आनंद होऊ शकतो. शक्यतो कोर्टाची पायरी चढू नये, असे आपल्याकडे म्हटले जाते. पण कोर्टाचा दरवाजा ठोठावल्यामुळे पुण्यातील प्रसाद दौंडकर या तरुणाला तब्बल तीन कोटी १० लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. विमा कंपनीकडून एवढ्या मोठ्या रकमेची भरपाई मिळण्याचे हे बहुदा महाराष्ट्रातील पहिलेच प्रकरण असावे.

काय आहे प्रकरण

प्रसाद दौंडकर याच्या गाडीला २०१३ साली पुण्यातील तळेगाव-चाकण रस्त्यावर अपघात झाला होता. त्याच्या गाडीला ट्रेलरने धडक दिली होती. या अपघातात प्रसादच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला तर प्रसादला कायमचं अंपगत्व आलं. आपल्याला अपघाताची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रसादने २०१३ साली ट्रेलरच्या मालकाविरोधात आणि रिलायन्स विमा कंपनीविरोधात पुण्यातील न्यायालयात खटला दाखल केला होता. पुणे जिल्हा सेशन कोर्टाने निर्णय देताना तीन कोटी १० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. प्रसाद दौंडकर याच्यातर्फे अतुल गुंजाळ यांनी न्यायालयात त्याची बाजू मांडली. यासंदर्भात गुंजाळ म्हणाले की, अशा स्वरुपाच्या खटल्यांमध्ये प्रतिवादी पक्षाकडून हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला जातो. या प्रकरणात जर रिलायन्स विमा कंपनीने हायकोर्टात याचिका दाखल केली. तर आम्ही सुद्धा तिथे जाऊन आमची बाजू मांडू. प्रसाद दौंडकर याला न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतः हायकोर्टात जाईन आणि तिथे त्याची बाजू मांडेन. जिल्हा कोर्टातील खटला जिंकून आम्ही एक टप्पा ओलांडला आहे. आता खरी लढाई हायकोर्टात होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *