पाण्यासाठी नागरिकआले रस्त्यावर

भवानी पेठेतील राजीव गांधी हौसिंग सोसायटीतील (एसआरए) विद्युतपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.या प्रकारामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी शुक्रवारी रात्री शंकरशेट रस्त्यावर ठिय्या आंदोलन केल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे काही वेळानंतर वाहतूक सुरळीत झाली.

कासेवाडी येथील झोपडपट्टीला आग लागल्यानंतर येथे २००५मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) राबविण्यात आला. या योजनेद्वारे जवळपास साडेचारशे कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. येथील वीज बिलाची एक कोटी रुपये थकबाकी आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे स्थानिकांना पाणीपुरवठा करण्याबरोबरच अनेक अडचणींना सामना करावा लागतो आहे. सोसायटीच्या स्थापनेवेळी विकसकाने प्रत्येक कुटुबांकडून देखभाल दुरुस्तीसाठी २० हजार रुपये घेतले असून, ही रक्कम कोटींच्या घरात असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. असे असतानाही विद्युत बिले भरले जात नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या सातशे ते आठशे रहिवाशांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, स्थानिक चारही नगरसेवकांनी नागरिकांची भेट घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर नागरिकांनी रात्री दहाच्या सुमारास आंदोलन स्थगित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *