आता जात वैधता प्रमाणपत्राची तयारी अकरावीतच

बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आल्याने यंदा प्रमाणपत्रासाठी ब-याच विद्यार्थी-पालकांची धावाधाव झाली. विद्यार्थी व पालकांची ही गैरसोय टाळण्यासाठी यापुढे दहावीनंतर महाविद्यालयात प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी आॅनलाइन अर्ज करण्याच्या सूचना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (बार्टी) शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. बार्टीने दिलेल्या आदेशानुससार शिक्षण विभागाने राज्याच्या जिल्ह्यातील संबंधित सर्व खासगी अनुदानित / विना अनुदानित / स्वयं अर्थसाहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत.
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विद्यार्थी / उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर त्याची पूर्ण पडताळणी होऊन प्रमाणपत्र मिळण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे. कधीकधी यासाठी आणखी वेळ होऊन विद्यार्थ्यांना मुदतीमध्ये प्रमाणपत्र प्रवेश घ्यायच्या संस्थांमध्ये सादर करणे जिकिरीचे होऊन जाते. हे टाळण्यासाठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांतील विद्यार्थ्यांनी १० वी पास झाल्यानंतर अकरावी विज्ञानामध्ये प्रवेश घेतेवेळीच आपला जात वैधता प्रमाणपत्रासाठीचा अर्ज आॅनलाइन भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

 विद्यार्थी हित लक्षात घेऊन त्यानुसार घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे पडताळणीसाठी समितीलाही पुरेसा वेळ मिळून विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र बारावी पास होण्याच्या आधी मिळू शकेल आणि ऐनवेळी व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी विद्यार्थी, पालकांची धावाधाव होणार नाही.

>ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत मात्र त्यांच्याकडे अद्याप प्रमाणपत्र नाही अशा विद्यार्थ्यांनी प्रस्ताव सादर करण्याची नोटीस कनिष्ठ महाविद्यालयांनी जाहीर करावी, अशा सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे प्रस्ताव समितीला पाठविण्याची जबाबदारी महाविद्यालयीन स्तरावरून पूर्ण करावी, असे निर्देशही मुखाध्यापक/ प्राचार्यांना देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *