यूपीत गुलकंद करमुक्त! ‘बनारसी पाना’ची मिठ्ठास आणखी वाढणार

यूपीत गुलकंद करमुक्त! ‘बनारसी पाना’ची मिठ्ठास आणखी वाढणार


स्वादिष्ट भोजनाची रंगत वाढविणाऱ्या मिठ्ठास ‘बनारस मसाला’ पानाची गोडी आणखी वाढणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने गुलकंदाला करमुक्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तेथे गुलकंदाची किंमत कमी होणार असून पर्यायाने ‘बनारस मसाला’ पानाच्या किमतीही घटण्याची शक्यता आहे.

अखिलेश यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गुलकंद निर्मितीमध्ये उत्तर प्रदेश हे अग्रेसर राज्य आहे. उत्तर प्रदेशातील कन्नौज या जिल्ह्यात गुलकंदाची निर्मिती सर्वाधिक होते. गुलकंदाचे औषधी परिणाम लक्षात घेऊन त्यावरील कर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा गुलकंदावर आधारित सर्व व्यवसायांना फायदाच होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतला आहे.

एकट्या कन्नौज जिल्ह्यात तीनशे कोटी रुपये किमतीच्या गुलकंदाचे उत्पादन होते. कन्नौजचा गुलकंद फक्त भारतातच प्रसिद्ध नाही. तर परदेशातही त्याला प्रचंड मागणी आहे, अशी माहिती मिळते. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथेही कन्नौजच्या गुलकंदाला विशेष मागणी आहे. त्यामुळे तेथेही गुलकंदाचे दर घटण्याचा फायदा ग्राहकांना होऊ शकतो.

‘गुलकंदावर राजस्थानमध्ये व्हॅट नाही. उत्तर प्रदेशातही तसा निर्णय व्हावा, अशी मागणी पान व्यावसायिक करत होते. सरकारने ती मागणी मान्य केली. त्यामुळे आता ‘बनारस मसाला’ पान स्वस्त होईल,’ अशी शक्यता अनुप केळकर या पान व्यावसायिकाने व्यक्त केली. पानांचे उत्पादन करण्यात उत्तर प्रदेशचा चौथा क्रमांक लागतो. पश्चिम बंगाल, ओडिशा आणि मध्य प्रदेश ही तीन राज्ये पान उत्पादनात अग्रेसर आहेत. त्यानंतर ‘यूपी’चा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशच्या बावीस जिल्ह्यांमध्ये पानांचे उत्पादन घेतले जाते.

गुलकंदाचे फायदे:

> गुलकंद थंड असल्याने पित्त कमी करतो.

> शरीरातील दाह आणि उष्णता घटवितो.

> डोळ्यांची जळजळ थांबवितो.

> दात मजबूत करण्याचे गुणधर्म.

> अंगदुखी, वेदना, थकवा दूर करण्याची क्षमता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *