मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

.
नालासोपारा येथे राहणाऱ्या १८ वर्षांच्या मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणीवर तीन नराधमांनी मुंबईत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणीला नेमके घटनास्थळ सांगता येत नसल्याने पोलिसही संभ्रमात असून १० ऑक्टोबरपासून आत्तापर्यंत तीन पोलिस ठाण्यांत हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एकही नराधम पोलिसांच्या हाती लागलेला नसून, तपास करायचा तरी कसा, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे

नालासोपारा येथे राहणाऱ्या स्वीटी (बदललेले नाव) हिचे बहिणीसोबत १० ऑक्टोबरला सायंकाळी भांडण झाले. मानसिक संतुलन बिघडलेली स्वीटी घरातून निघाली ती दुसऱ्या दिवशी ११ ऑक्टोबरला घरी परतली. यावेळी तिची प्रकृती खालावलेली होती. बहिणीने विचारले असता, पोटात खूप दुखत असल्याचे तिने सांगितले. वडिलांनी आणि बहिणीने स्वीटीला डॉक्टरकडे नेले असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले. याबाबत स्वीटीला विचारल्यानंतर तिघांनी आपल्यावर जबरदस्ती केल्याचे तिने सांगितले. या प्रकारामुळे धक्का बसलेल्या तिच्या वडिलांनी नालासोपारा येथील तुळींज पोलिस ठाण्यात तक्रार केली. स्वीटीने त्या रात्री वांद्रे येथे गेल्याचे पोलिस चौकशीदरम्यान सांगितले. स्वीटीचे कुटुंब काही वर्षांपूर्वी वांद्रे येथील निर्मलनगरमध्ये राहत होते. त्यामुळे तुळींज पोलिसांनी हा गुन्हा निर्मलनगर पोलिसांकडे वर्ग केला. स्वीटीकडे सापडलेल्या कागदाच्या तुकड्यावर एक मोबाइल नंबर लिहिण्यात आला होता. हा नंबर वांद्रे येथे राहणाऱ्या राहुल मिश्रा याचा असून तो स्वीटीसोबत शाळेत एकत्र होता, अशी माहिती तिच्या बहिणीने दिली. निर्मलनगर पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता मोबाइल नंबरसाठी देण्यात आलेला पत्ता हा ताडदेव येथील असून, मोबाइलधारकाचे नाव राहुल नव्हे तर मनोज साहा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हा गुन्हा ताडदेव पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

स्वीटीचे मानसिक संतुलन ठीक नसल्याने तिला नेमके घटनास्थळ सांगता येत नाही. ताडदेव पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी ती ‘समुद्र’ आणि ‘जुहू’ असे बोलू लागली. त्यामुळे ताडदेव पोलिसांनी तिला हाजीअली समुद्राजवळ नेले. पण, तरीही काही धागेदोरे मिळाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुख्य आरोपी परदेशात पळाला?

मुख्य आरोपीचा मोबाइल नंबर हा एकच क्ल्यू सध्या पोलिसांकडे आहे. मात्र, घटना घडल्यापासून मोबाइल नंबर बंद आहे. पोलिसांचे पथक बिहारपर्यंत जाऊन आले पण हाती काहीच लागले नाही. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी परदेशात पळाल्याचा संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *