परीक्षा २ वाजता, प्रवेशपत्र दीड वाजता

विद्यापीठांतर्गत सुरू झालेल्या हिवाळी परीक्षेची वेळ २ वाजता असताना महाविद्यालयाने परीक्षार्थी विद्यार्थ्यांना दीड वाजता परीक्षा प्रवेशपत्राचे वाटप केल्याचा प्रकार सोमवारी उजेडात आला. येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात हा प्रकार घडला.
सर्व महाविद्यालयांना ५ ते २५ नोव्हेंबर पर्यंत दिवाळीच्या सुट्टया जाहीर करण्यात आलेल्या आहेत. कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांना हॉलटिकीट घेता आले नाही. सोमवारी परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांनी हॉलतिकीट मिळविण्याकरीता संबधित महाविद्यालयात संपर्क साधला. ऐनवेळी ते डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमासाठी सेमिस्टर पॅटर्न परीक्षा सुरू होण्यापूर्वीच संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध होणे अनिवार्य होते. पण तसे झाले नसल्याचे महाविद्यालयचे म्हणणे आहे. दरम्यान महाविद्यालयाला दिवाळीच्या सुट्या जाहीर झाल्या. बीएससीच्या तृतीय सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांचा सोमवारी दुपारी दोन वाजता परीक्षा होती. त्यांनी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात प्रवेशपत्रासाठी संपर्क साधला. विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेशपत्रच तयार नव्हते. परिस्थितीचे गांर्भीय ओळखून ऐनवेळी परीक्षा प्रवेशपत्र त्यांना डाऊनलोड करुन कशीबशी वेळ मारून नेण्यात आली. हाच प्रकार बीसीएच्या विद्यार्थ्यांसंदर्भातही घडला. परीक्षेला १५ मिनिटे श्ल्लिक असताना प्रवेशपत्र त्यांच्या हाती आले.
विद्यापीठाने प्रवेशपत्र वेळेत अपलोड केले नसल्याने हा गोंधळ उडाला, असा आरोप महाविद्यालयाचा आहे. हे खरे असले तरी विद्यार्थी नियमित असताना महाविद्यालयाने परीक्षेचा नेमका दिवस उजाडण्यापूर्वी प्रवेशपत्र तयार का ठेवले नाही, हा प्रश्नही महत्त्वपूर्ण आहे. विद्यापीठ प्रशासन आणि महाविद्यालयीन प्रशासन या गंभीर मुद्याची कशी दखल घेते याकडे जाणकारांच्या नजरा आहेत.

६ नोव्हेंबर रोजी सर्व महाविद्यालयांना प्रवेशपत्र आॅनलाईन उपलब्ध करून देण्यात आले. १० नोव्हेंबरला ते विद्यार्थ्यांना तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. त्याअनुषंगाने प्रसिद्धी देण्यात आली होती. ही चूक विद्यापीठाची नाही.
– हेमंत देशमुख, परीक्षा नियंत्रक, अमरावती विद्यापीठ

प्रवेशपत्र ६ नोंव्हेंबरला उशीरा अपलोड करण्यात आले. त्यानंतर दिवाळी होती. सुट्याही होत्या. तीन दिवसांत ५०० विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र कसे वितरीत करणार? दिरंगाई विद्यापीठाकडून झाली. हा अनुभव नेहमीचाच आहे.
– व्हि.जी.ठाकरे,
प्राचार्य, शिवाजी विज्ञान महाविद्यालय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *