हे शिक्षक रोज चढतात झाडावर

सोहरी खास या झारखंडमधील पालम जिल्ह्यातल्या गावातल्या शाळेची घंटा सकाळी घणघणते आणि सहा शिक्षक लगबगीने बाहेर येतात…शाळेच्या आवारातल्या पळसाच्या झाडाखाली गोळा होतात.. मग सुरू होते एक कसरत. यापैकी एकेक शिक्षक हातात टॅबलेट घेऊन झाडावर चढू लागतो. चढताना टॅबलेट घेतलेला हात हवेत वाकडा-तिकडा फिरत असतो… नव्हे..नव्हे.. हे कोणतं योगासन वगैरे नाही. हे शिक्षक त्यांच्या बायोमॅट्रिक हजेरीसाठी झाडावर इंटरनेट नेटवर्क शोधत असतात!

‘शाळेच्या संपूर्ण आवारात इंटनरेट कनेक्टिव्हिटी नाही. झाडावर चढून वाट पाहिली तर आम्हाला २जी नेटवर्क मिळतं, पण तेही इतकं कमकुवत असतं की अनेकदा त्याचाही काही उपयोग होत नाही,’ अनुप कुमार गुप्ता हे विज्ञानाचे शिक्षक माहिती देत होते. हे सर्व सहा शिक्षक विशी ते चाळीशीतले आहेत. सर्वच झाडावर चढू शकत नाहीत. मग उर्वरित पारंपरिक पद्धतीने रजिस्टरवर हजेरी लावतात.

ही झारखंडच्या एकाच शाळेची स्थिती नाही. उत्तर-पश्चिम झारखंडमधल्या सर्वच शाळांमध्ये हीच स्थिती आहे. राज्य सरकार मात्र डिजीटल कनेक्टिव्हिटीचा पुरस्कार करत आहे. ग्यानोदय योजनेंतर्गत मुख्यमंत्री रघुबर दास यांनी २०१७ मध्ये शाळांना टॅबलेट्स वाटायला सुरुवात केली. या टॅबमध्ये ई-विद्यावाहिनी अॅप इन्स्टॉल केलेला आहे. यात शिक्षकांची बायोमेट्रिक हजेरी लागते. विद्यार्थी प्रवेश, शाळाबाह्य विद्यार्थ्यांची नोंदही यामुळे होते. २०१ ते १००० मुलांमागे दोन, १००१ ते २००० मुलांमागे तीन त्यावर चार असे टॅबलेट्स दिले जातात.

या सोहरी खास गावच्या शाळेत ८०० विद्यार्थी आहेत. २५ सप्टेंबरला शाळेत टॅब आला आणि तेव्हापासून त्या पळसाच्या झाडाने शिक्षकांना झपाटून टाकलं आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *