रिक्षा-टॅक्सीचालकांची भाडेवाढीची मागणी

इंधनदरांमध्ये होणाऱ्या वाढीची झळ रिक्षा, टॅक्सी व्यवसायासही बसू लागली आहे. सीएनजी दरांमधील वाढीने त्रस्त झालेल्या रिक्षा-टॅक्सीचालकांनी भाडेदरात वाढीची आग्रही मागणी केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांना दरवाढीस सामोरे जावे लागण्याची भीती आहे.

हानगर गॅसने सीएनजीच्या दरांमध्ये मंगळवारपासून २ रुपये ६६ पैशांची वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे सध्याचे सीएनजीचा दर ४९ रु. ६१ पैशांवर गेला आहे. या वाढीमुळे व्यवसाय करण्यात अडचणी येत असल्याने दरांत वाढ करावी, अशी मागणी पुढे आली आहे. रिक्षा टॅक्सीचालक संघटनांना वाढीव दरांच्या अनुषंगाने किमान तीन रुपयांची दरवाढ अपेक्षित आहे.

सध्या रिक्षासाठी किमान १८ आणि टॅक्सीसाठी २२ रुपये भाडे आकारले जाते. संघटनांची तीन रुपयांची वाढ मान्य झाल्यास नवीन भाडे २१ रु. आणि २५ रु.पर्यंत जाऊ शकते. रिक्षा, टॅक्सी भाडेवाढ ठरवताना वेगवेगळे घटक विचारात घेतले जातात. त्याअनुषंगाने परिवहन विभागाचे धोरण असून त्यादृष्टीने आणि इंधन दरातील वाढीचा विचार करता तीन रुपयांची भाडेवाढ करावी, अशी मागणी मुंबई ऑटोटॅक्सी मेन्स युनियनचे शशांक राव यांनी केली आहे.

शहरांमध्ये मेट्रोची कामे सुरू असून सीएनजी पंपांवर सीएनजी भरण्यासाठी मोठ्या रांगा लागतात. शहरात वाहतूककोंडीनेही रिक्षा, चालक त्रस्त झाले आहेत. त्यात सीएनजी वाढीने व्यवसाय कठीण झाला असल्याने भाडेवाढ करावी, अशी मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे नेते ए.एल. क्वॉड्रोस यांनी केली आहे.

मुंबईतील रिक्षा-टॅक्सीची संख्या

रिक्षा-१लाख आठ हजार

सध्याचे भाडे-१८ रु.- मागणी २१ रु.

टॅक्सीची संख्या – ३५ हजार

सध्याचे भाडे- २२रु.- मागणी २५ रु.

भाडेनिश्चिती धोरण

भाडेवाढीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाची (एसटीए) मंजुरी आवश्यक असते. भाडेवाढीसाठी राहणीमानाचा दर्जा, वाहनांच्या दुरुस्तीसाठी एका वर्षात येणारा खर्च, इन्शुरन्स, कर, इंधनाच्या किंमती, वाहनांची किंमतीचा त्यात समावेश असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *