लेखिका कविता महाजन यांचे निधन

‘ब्र’ आणि ‘भिन्न’ या कादंबरीने मराठी साहित्य विश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या लेखिका कविता महाजन  यांचे न्यूमोनियाच्या आजाराने पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये गुरुवारी सायंकाळी निधन झाले. त्या ५१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे मुलगी व वडील असा परिवार आहे. लेखिका, कवयित्री आणि समाजजीवनाच्या अभ्यासक अशी ओळख असणाऱ्या महाजन यांच्या निधनाने साहित्य विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

महाजन यांना गेल्या आठवड्यापासून ताप होता. त्याशिवाय काही दिवसांपासून खोकला आणि दम लागत होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील बावधन भागातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, हॉस्पिटलने ‘एच-१ एन-१’ची चाचणी घेतली असता, ती निगेटिव्ह आली. न्यूमोनिया झाल्यामुळे उपचारांदरम्यान महाजन यांचा सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाल्याचे खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले.

महाजन यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात काम उभे केले होते. आदिवासी समाजजीवनाचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. आदिवासी समाज व महिला यांचे प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले. आपल्या लेखनातून या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले. महाजन यांचा जन्म ५ सप्टेंबर १९६७ रोजी नांदेड येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयामध्ये झाले. नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. मराठी साहित्य या विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली होती. त्यांना मानाच्या साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. दरम्यान, महाजन या काही दिवसांपूर्वीच वसई येथून पुण्यात राहण्यास आल्या होत्या. त्यानंतर त्या आजारी पडल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *