कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात श्वानदंशाच्या प्रकारांत वाढ झाली आहे. जिल्ह्यासह शहरातील गल्ली, रस्त्यांवर आढळणाऱ्या भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना होणाऱ्या श्वानदंशाचे प्रमाण अधिक आहे. चालू वर्षात १५६० जणांना श्वानदंश झाल्याची नोंद छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात(सीपीआर) झाली आहे. तर रेबीजची लागण झाल्याने पाच वर्षात १७ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. रेबीजग्रस्त रुग्णांमध्ये कुत्रा चावल्याने बाधा झालेल्यांची संख्या ९५ टक्क्यांहून अधिक आहे. गेल्या पाच वर्षांत हे प्रमाण सातत्याने वाढत आहे.
शहर- जिल्ह्यात वाढत्या अस्वच्छतेमुळे भटक्या कुत्र्यांचे प्रमाण अधिक आहे. त्याला पायबंद घालण्यात प्रशासन कमी पडल्याने श्वानदंशाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच मांजर, घोडा, माकड, ससा या प्राण्यांपासून दंशाचे प्रमाणही अधिक आहे. वेळेत उपचार न घेतल्यास रेबीजसारख्या घातक व जीवघेण्या रोगाची लागण झाल्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. श्वान किंवा इतर प्राण्यांचा दंश झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. रेबीज हा रोग घातक असला तरी प्रतिबंधात्मक काळजी घेतल्यास त्यावर मात करणे सहज शक्य आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होते.
काय आहे रेबीज
कुत्रा, मांजर, माकड, घोडा, ससा यांसह इतर काही रेबीज विषाणूग्रस्त प्राण्यांनी दंश केल्यास त्यांच्या लाळेमधून विषाणू मानवाच्या शरीरात प्रवेश करतात. त्याचा मेंदूवर परिणाम होऊन मानवाच्या जीवाला धोका निर्माण होतो. जखम आणि मेंदूचे अंतर यावर त्याची तीव्रता अवलंबून असते. हात, पाय, चेहरा, डोक्याचा भाग याठिकाणी झालेला दंश अधिक धोकादायक मानला जातो. रेबीजची लागण झाल्यानंतर लक्षणे व्यक्तिपरत्वे तीव्रतेनुसार जाणवतात. साधारणपणे २० ते ३० दिवसांत लक्षणे जाणवतात. कधीकधी लक्षणांचा कालावधी वर्षापेक्षा अधिक वाढू शकतो.
लक्षणे
रेबिजग्रस्त रुग्णांत ताप, तीव्र डोकेदुखी, पायात कमजोरी, जखमेची खाज व आग होणे अशी प्राथमिक लक्षणे आढळतात. रेबीजमुळे पक्षाघात व हृदयावरदेखील विपरीत परिणाम होतो. तसेच उलट्या झाल्यासारखे वाटणे, विषाणू मेंदूपर्यंत पोहोचल्यास झटके येणे, निद्रानाश होणे, घशात त्रास, मानसिक आभास होणे, आवाजात बदल अशीही लक्षणे आढळतात.
श्वानदंश झाल्यास
कुत्रा किंवा कोणताही प्राणी चावल्यास जखम स्वच्छ पाण्याने साबणाचा वापर करून धुवावी. त्यामुळे लागण होण्याचा धोका कमी होतो. तसेच जखम झाकू नये ती उघडी ठेवावी. जखम हाताळून झाल्यास वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत. तसेच लगेच प्रतिबंधात्मक अँटीरेबीज लस व सिरम जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून घ्यावी. लसीचे चार डोस पूर्ण करावेत. मध्येच उपचार बंद केल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच गावठी उपचार घेऊ नयेत. काहीवेळा जखमेवर चुना तंबाखू लावण्याचे प्रकार घडतात ते टाळावे.
कुत्रा पाळत असाल तर
घरी कुत्रा पाळला असल्यास त्याला दर सहा महिन्यांनी रेबीजची लस द्यावी. तसेच त्याला भटक्या कुत्र्यांच्या संपर्कात येऊ देऊ नये. गरज भासल्यास तत्काळ पशूवैद्यकीय तज्ज्ञांशी संपर्क करावा.
सीपीआरला लसीचा तुटवडा
श्वान व इतर प्राण्यांच्या दंशात वाढ झाल्याने दररोज जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरुनही लोक उपचारासाठी सीपीआरमध्ये येतात. गेल्या वर्षभरापासून लसींचा तुटवडा जाणवत आहे. हाफकिन या संस्थेकडून लशीचा पुरवठा केला जातो. खाजगी रुग्णालयांत लस महाग असल्याने नागरिक सीपीआरला प्राधान्य देत असतात.
श्वान किंवा इतर प्राण्यांचा दंश झाल्यास जखम तत्काळ स्वच्छ पाण्याने धुवावी. तसेच लगेच लसीकरण करून घ्यावे. अनेकदा चार डोस पूर्णपणे न घेतल्याने रेबीजची लागण झाल्याचे रुग्ण आढळले आहेत. गावठी, अघोरी उपचार न करता सरकारी रुग्णालयांत जाऊन लस घेण्यास प्राधान्य द्यावे.
