स्क्रब टायफसने घेतला महिलेचा बळी

स्क्रब टायफस’ नावाच्या आजाराने विदर्भाला वेठीस धरले आहे. सोमवारी पुन्हा एका महिलेचा बळी घेतला तर १० वर्षीय मुलीसह तीन महिला पॉझिटिव्ह आल्या आहेत. या आजाराने केवळ दीड महिन्याच्या कालावधीत १७ रुग्णांचा जीव घेतला आहे, तर ११९ रुग्णांना गंभीर आजाराच्या श्रेणीत नेऊन ठेवले आहे. इंदिरा विलास मोहन (३६) रा. अमरावती असे मृताचे नाव आहे.
स्क्रब टायफस आजारावर सध्या तरी प्रतिबंधक लस नाही. यामुळे याला घेऊन लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. सणासुदीच्या काळात आजार नियंत्रणात येण्यापेक्षा वाढतच चालल्याने लोकांमध्ये आता या आजाराला घेऊन प्रशासनाविरोधात संताप पसरत आहे. प्राप्त माहितीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ४ सप्टेंबर रोजी इंदिरा मोहन ही महिला दाखल झाली. १७ सप्टेंबर रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासोबतच नरखेड येथील १७ वर्षीय, कुही येथील ३५ वर्षीय महिला तर अमरावती येथील १० वर्षीय मुलीला हा आजार असल्याचे निदान झाले.
मेडिकलमध्ये २१ रुग्ण
मेडिकलमध्ये सद्यस्थितीत स्क्रब टायफसचे २१ प्रौढ रुग्ण वॉर्ड क्रमांक २५ मध्ये उपचार घेत आहेत तर, बालरोग विभागात सहा मुले अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गोसावी यांच्यानुसार मेडिसीन विभागात आतापर्यंत ८३ रुग्ण आढळून आले असून, १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *