कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना सरकारची २५ लाखांची मदत

जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन रक्षकमध्ये शहीद झालेले मेजर कौस्तुभ प्रकाशराव राणे यांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. शहीद मेजर कौस्तुभ हे ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथील रहिवासी होते. त्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.

शहीद मेजर कौस्तुभ यांची वीरपत्नी कणिका यांना १५ लाख, वीरमाता ज्योती यांना पाच लाख आणि वीरपिता प्रकाशकुमार राणे यांना पाच लाख अशी एकूण २५ लाख रुपयांची मदत शहीद मेजर कौस्तुभ यांच्या वारसांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सैनिक कल्याण विभागाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार वरील मदत देण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.

युद्धात, युद्धजन्य परिस्थितीत तसेच देशातील सुरक्षा संबंधित मोहिमेत, चकमकीत, देशाबाहेरील मोहिमेत धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या वारसांना, अंपगत्व आलेल्या सैनिकांना तसेच देशातील चकमकीत धारातीर्थी पडलेल्या सीमा सुरक्षा बल व इतर तत्सम निमलष्करी दलातील अधिकारी, जवानांच्या विधवांना कुटुंबीयांना २७ मार्च २०१८ रोजी शासन निर्णयान्वये आर्थिक मदत देण्यात येते.

सरकारचे धोरण

धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या बाबतीय देय असलेली आर्थिक मदतीची विभागणी खालीलप्रमाणे विभागून देण्यात येते. शहीद सैनिक विवाहित असेल तर आणि त्याचे आई वडील हयात असतील तर त्यांची वीरपत्नी यांना ६० टक्के, वीरमाता २० टक्के आणि वीरपिता २० टक्के अशी मदत देण्यात येते. तसेच आई वडिलांपैकी आई किंवा वडील हयात असल्यास त्यांना ४० टक्के मदत दिली जाते. शहीद सैनिक विवाहित असेल आणि शहिदाचे आई वडिल हयात नसतील तर त्याची वीरपत्नीला १०० टक्के, शहीद सैनिक अविवाहित असेल तर आणि त्याचे आई वडील हयात असतील तर आई वडिलांना समान विभागणी करुन मदत दिली जाते. शहिद सैनिक अविवाहित असेल व आई वडिल हयात नसतील तर अशा प्रकरणात त्यांच्या भाऊ बहिणींना समान विभागणी करून मदत देण्याचे धोरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *