महापुरामुळे केरळमध्ये हाहाकार माजला असून आजवर ३२४ लोकांचा मृत्यू झाला असून ८२ हजार लोकांना वाचवण्यात आले आहे. या भीषण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नेरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल झाले आहेत. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास थिरुअनंतपुरम विमानतळावर त्यांचे आगमन झाले. गेल्या १०० वर्षांतला केरळमधील हा सर्वात भीषण पूर असल्याचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी म्हटले आहे.
दिल्लीत दुपारी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम उरकल्यानंतर पंतप्रधान मोदी केरळकडे रवाना झाले. केरळमधील पूरस्थिती क्षणाक्षणाला भीषण रुप धारण करीत असल्याने सोशल मीडियातून इथल्या जनतेच्या मदतीसाठी आवाहन केले जात आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकार जॉन अब्राहमसह अनेक कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
दरम्यान, दिल्लीत अटलजींच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम उरकल्यानंत पंतप्रधान आता केरळची परिस्थिती जाणून घेण्यासाठी येथे दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री पिनरयी विजयन, केरळचे राज्यपाल पी. सथसिवन आणि केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे. अल्फान्सो यांनी त्यांचे थिरुअनंतपुरम विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर शनिवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण करतील, अशी माहिती सुत्रांकडून कळते.