वांद्रे स्वच्छ टर्मिनस तर कल्याण गलिच्छ स्थानक

मुंबईतील वांद्रे टर्मिनस हे देशातील सातव्या क्रमांकांचं स्वच्छ स्थानक ठरलंय. तर कल्याण हे अस्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात घाणेरडं स्थानक ठरले आहे. रेल्वेनं केलेल्या स्वच्छता सर्व्हेत नेमकं काय आढळलं,

लोकल रेल्वेसेवा. मुंबईकरांची लाइफलाइन. मुंबईकरांचा बहुतांश वेळ खर्च होतो तो या लोकल प्रवासात आणि  रेल्वे स्थानकांवर. या रेल्वे स्थानकांची नेमकी काय स्थिती आहे? तिथं स्वच्छतेची काय काळजी घेतली जाते? प्रवाशांच्या सुरळीत येण्या-जाण्यासाठी तिथं काय व्यवस्था आहे? स्टेशन्सच्या बाहेर पार्किंगची व्यवस्था आहे का? याच निकषांवर रेल्वेनं केला देशव्यापी स्वच्छता सर्व्हे…

देशातील ४०७ रेल्वे स्थानकांचं सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात  टॉप टेन स्वच्छ स्थानकांमध्ये मुंबईतील केवळ वांद्रे टर्मिनस या एकमेव रेल्वे स्थानकाचा समावेश झालाय.गेल्यावेळी १५ व्या स्थानी असलेले वांद्रे स्थानक यंदा ७ व्या क्रमांकावर पोहोचलंय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १३ व्या, लोकमान्य टिळक टर्मिनस ३५ व्या, मुंबई सेंट्रल टर्मिनस ४० व्या स्थानी, दादर ४९ व्या स्थानी तर ठाणे ५७ व्या स्थानी आहे.

अस्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत कल्याणनं देशात दुसरा क्रमांक पटकावला. तर उत्तर प्रदेशातील मथुरापाठोपाठ कल्याण हे दुसऱ्या क्रमांकाचं गलिच्छ स्थानक ठरलंय. एकीकडं मुंबईतून रेल्वेला करोडो रूपयांचं उत्पन्न मिळतं. मात्र त्या तुलनेत रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेकडं पुरेसं लक्ष दिलं जात नाही, हेच यातून स्पष्ट झालंय. वायफाय सुविधा पुरवण्यापेक्षा रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेकडं अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *