सूरतमध्ये १६ वर्षांच्या मुलाचे अपहरण करुन त्याची हत्या केल्याप्रकरणी अटक केलेले दोन आरोपी हे सीरियल किलर असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या दोन नराधमांनी गेल्या वर्षभरात १० जणांची हत्या केल्याचा संशय असून प्रकरणाचे गांभीर्य पाहता या गुन्ह्यांचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
सूरतमध्ये सहा महिन्यांपूर्वी १६ वर्षांच्या मुलाची अपहरणानंतर हत्या करण्यात आली होती. त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचेही समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी २४ जुलै रोजी अजय जाधव (वय २१) आणि रवी नायका (वय १८) या दोघांना अटक केली होती. या दोघांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड झाली. अजय आणि रवी या दोघांनी १० जणांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. यातील तीन गुन्ह्यांची उकल झाली असून उर्वरित प्रकरणांचा तपास सुरु आहेत. सूरत पोलिसांना गेल्या वर्षभरात ९ बेवारस मृतदेह सापडले होते. आरोपींनी कबुली दिल्यानंतर पोलिसांनी सूरत आणि लगतच्या भागातील बेवारस मृतदेहांचा तपशील तपासून बघण्यास सुरुवात केली आहे.
सूरत गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, अजय आणि रवी हे चाकूचा धाक दाखवून लोकांना लुटायचे. यानंतर त्यांच्यावर अत्याचार करायचे. पीडितांनी प्रतिकार केल्यास त्यांची हत्या केली जायची. अजय हा रिक्षाचालक असून दोन्ही आरोपी हे रिक्षेतूनच सावज शोधत फिरायचे. त्यांनी कचरा गोळा करणाऱ्या एका मुलाचीही अशाच पद्धतीने हत्या केली होती. या दोघांनाही कोर्टाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.