दिघा टेकडीवर २५ हजार फळझाडांची लागवड

एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने दिघा येथील वनविभागाच्या जागेवर २५ हजार झाडांची लागवड नुकतीच करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी केवळ शोभेची झाडे न लावता येथील झाडांवर प्राणी-पक्षी येतील, या उद्देशाने येथे वड, आंबा, फणस, जांभूळ, कडुलिंब यांसारख्या फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीअंतर्गत पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने राबविलेली ही संकल्पना उल्लेखनीय झाली आहे.

सध्या झाडांची संख्या कमी होऊन सिमेंटच्या इमारतींचे जंगल वाढत आहे. प्राणी-पक्ष्यांना राहायला जागा आणि खायला अन्न मिळत नसल्याने ते शहराकडे येऊ लागले आहेत. त्यामुळे आता त्यांच्यासाठी जंगल उभारण्याची  गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे दिघा टेकडीवर ही झाडे लावताना त्या ठिकाणी असणाऱ्या झाडांवर प्राणी-पक्षी यावेत, त्यांच्या राहण्या-खाण्याची सोय व्हावी, तिथे त्यांनी घरटी बांधावीत या अनुषंगाने त्या ठिकाणी झाडे लावण्याच्या सूचना पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केल्या होत्या. त्यापूर्वी तिथे सप्तपर्णीची झाडे लागवडीसाठी आणण्यात आली होती. मात्र आयुक्तांच्या सूचनेनंतर फळझाडांची लागवड येथे करण्यात आली आहे. ही २५ हजार झाडे लावण्यासाठी पालिकेने वनविभागाच्या वन विकास महामंडळाला सांगितले होते. त्याचा खर्च पालिकेने दिला आहे. तीन वर्षांसाठी महामंडळ या झाडांचे संगोपन करणार आहे. पावसाळ्यानंतर तिथे झाडांना पाणी घालण्याचे कामही तेच करणार आहेत. शिवाय, पहिल्या वर्षी लावलेली झाडे सुकली तर त्या जागी दुसरी झाडे लावण्याची आणि ते झाड तीन वर्षे जपण्याची जबाबदारीही महामंडळावरच आहे. मात्र केवळ पहिल्या वर्षीच्या लागवडीचा आणि देखभालीचाच खर्च पालिका करणार आहे. पुढील दोन वर्षे महामंडळ त्यांची काळजी घेणार आहे.

या ठिकाणी सर्व प्रकारची फळझाडे आवर्जून लावली आहेत. प्राणी-पक्ष्यांना तिथे राहता यावे आणि वृक्षलागवडीचा अर्थ खऱ्या अर्थाने सफल व्हावा, यासाठी या फळझाडांची लागवड केली गेली आहे आणि त्यांची जोपासनाही केली जाणार आहे. या ठिकाणी झाडांची वाढ होऊन, त्यावर फळे यायला वेळ लागेल, मात्र त्याचा फायदा होणार हे नक्की!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *