वर्षभरात १३ हजार बालमृत्यू

राज्यात बालमृत्यू  रोखण्यासाठी वेगवगेळ्या उपाययोजना करूनही एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत १३ हजार ५४१ बालमृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोमवारी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.

२०१७-१८ या कालावधीतील मुंबईतील आकडेवारीनुसार जन्माला आल्यानंतर पहिल्या चोवीस तासात ४८३ बालक दगावल्याचे सावंत यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.

राज्यातील बालमृत्यूबाबत समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. त्यावर सर्वाधिक म्हणजे २२ टक्के बालमृत्यू हे कमी वजनाच्या आणि अपुऱ्या वजनाच्या अर्भकांचे झाले. तर न्युमोनिया आणि जंतुसंसर्गामुळे ७ टक्के, अतिसारामुळे ०.३२ टक्के, श्वसनाच्या आजारांमुळे ७ टक्के, श्वसनमार्गाच्या विकारामुळे २० टक्के अर्भकांचा मृत्यू झाल्याचे डॉ. सावंत यांनी म्हटले आहे.

या बालमृत्यूपैकी शून्य ते २८ दिवसांमध्ये ६५ टक्के, तर २८ दिवस ते एक वर्षाच्या कालावधीत २१ टक्के बालके मृत्यू पडली आणि एक ते पाच वर्षे वयोगटातील बालमृत्यूचे प्रमाण १४ टक्के असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात दिली आहे. हे बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्यात गरोदरपणातील संपूर्ण तपासणी, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, नियमित लसीकरण, नवजात काळजी कक्ष आदी कार्यक्रम राववण्यात येत असल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

बालमृत्यूची कारणे आणि टक्केवारी

कमी वजन , अपुऱ्या दिवसांचे अर्भकांचा मृत्यूचे प्रमाण- २२ टक्के

न्युमोनिया आणि जंतुसंसर्ग- ७ टक्के

अतिसार- ०. ३२ टक्के

श्वसनाचे आजार- ७ टक्के

श्वसनमार्गाचे विकार-१० टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *