तिलारी घाटात कार कोसळून ५ ठार

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामधील तिलारी घाटात वॅगन आर कार कोसळून पाच जण जागीच ठार झाले. अपघातात ठार झालेले पाचही तरुण बेळगावचे असून सुट्टीनिमित्त ते तिलारी घाट परिसरात फिरायला गेले होते. अपघातात ठार झालेले पाच पैकी चार जण भक्ती महिला सोसायटीचे कर्मचारी होते.

यल्लप्पा पाटील (वय ४५), पंकज उर्फ जोतिर्लिंग संपत तेवेकर (वय ३०), मोहन लक्ष्मण रेडकर (वय ४०), नागेन्द्र शिदापा बाबू गावडे (वय २९) आणि कृष्ण मुकुंद गावडे (वय १९) अशी अपघातात ठार झालेल्या पाच जणांची नावे आहेत. या तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तिलारी घाट सुरू होताना लष्कर पॉईंट जवळ ही दुर्घटना घडली आहे. लष्कर पॉईंट ही जागा अगदी धोक्याची असून या ठिकाणी संरक्षक लोखंडी खांब आहेत. मात्र पुढील बाजुला जागा मोकळी आहे. या ठिकाणी गवतात गाडीचे ब्रेक सुध्दा लागत नाहीत. कारचे ब्रेक न लागल्यामुळे कार घाटात कोसळली आणि पाच जणांना प्राण गमवावे लागले. पाच जण जागीच ठार झाले असून दोघांचे मृतदेह गाडीत अडकले होते ते काढण्यासाठी कटरने कारचा पत्रा कापून काढावा लागला. उर्वरीत तीन पैकी दोन मृतदेह गाडीच्या बाहेर तर एक मृतदेह गाडी पडल्याच्या ठिकाणाहून दूर अंतरावर पडला आहे.

चंदगड पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर मृतदेह आणि वाहन काढण्यास सुरुवात करण्यात आली. पावसामुळे आणि गाडी पडली आहे ते ठिकाण उताराला असल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. घटनास्थळाहून मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पोस्टमॉर्टेमसाठी चंदगडला आणण्यात आले आहेत. आवश्यक ते सोपस्कार पूर्ण करून मदत करण्यासाठी बेलगावहून माजी महापौर विजय मोरे, माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री, अभिजित चव्हाण, सुनील पाटील चंदगडला गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *