मुसळधार पावसाचा जोर आज ओसरला

रविवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर आज ओसरला असला तरी बऱ्याच ठिकाणी पावसाची रिपरिप सुरुच आहे . मुंबईतील काही उपनगरांमध्ये पावसाने विश्रांती घेतली असली तरी पश्चिम रेल्वेची वाहतूक अजूनही पूर्वपदावर आलेली नाही.

मुंबईच्या दक्षिण आणि पश्चिम उपनगरांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. मंगळवारी पूर्णपणे ठप्प झालेल्या हार्बर रेल्वेची वाहतूक आता सुरळीतपणे सुरु आहे. सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे दादर ,सायन, ठाणे ,परळ आणि डोंबिवलीसह अनेक उपनगरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. वसई विरार भागातील जनजीवन अजूनही विस्कळीतच आहे. पावसाचा फटका मुंबईतील विमानसेवेला ही बसला आहे. दोन दिवसांत ३००हून अधिक विमानांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेच्या लोकल वाहतूकीवर अद्याप परिणाम झालेला नाही. काल १०-१५ मिनिटं उशिराने सुरु असणारी वाहतूक आज सुरळीतपणे सुरु आहे. पण मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेससह ३ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत तर २ ट्रेन्सचे मार्ग बदलण्यात आले आहेत पश्चिस रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक मात्र अजूनही पूर्वपदावर येण्याची चिन्हं नाही. पश्चिम रेल्वेने ६ एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत. गेले दोन दिवस विस्कळीत झालेली चर्चगेट-भाईंदर लोकल वाहतूक धिम्या गतीने सुरु झाली आहे. नालासोपाऱ्यात रुळांवर भरलेलं पाणी काढण्यासाठी लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकांची मदत घेण्यात येते आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरी वसई-विरार रेल्वे वाहतूक मात्र ठप्पच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *