भाजीपाल्याची आवक कमी

गेले चार दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा बटाटा, भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. तर, पाऊस असल्याने खरेदीसाठी बाजारात किरकोळ व्यापाऱ्यांनीही पाठ फिरविली आहे. परिणामी, किरकोळ बाजारात मंगळवारी भाजीपाल्याचे दर वाढलेले पहायला मिळाले.

वाशीतील घाऊक भाजीपाला बाजारात मंगळवारी ४८० टेम्पो तर, ११३ ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. मात्र या गाड्यांमधून भाजीपाला येण्याचे प्रमाण फारच कमी होते. सतत पडणाऱ्या पावसामुळे भाजीपाल्याच्या पुरेशा गाड्या बाजारात येऊ शकल्या नाहीत. त्यातच पावसातून जो काही भाजीपाला बाजारापर्यंत आला होता, तोही मोठ्या प्रमाणात बाजारात पडून होता. पावसामुळे भाजीपाला खरेदी करण्यासाठी किरकोळ व्यापारी बाजारात पोहोचू शकले नाहीत. रस्त्यावर कोंडी असल्याने मुंबईमधील तुरळकच व्यापारी भाजीपाला, कांदा बटाटा खरेदीसाठी बाजारात पोहोचू शकले होते.

कांदा बटाटा बाजारात मंगळवारी कांद्याच्या शंभर गाड्यांऐवजी ५८ गाड्या आल्या होत्या, तर बटाट्याच्याही ५५ गाड्या पोहोचू शकल्या. लसणाच्या केवळ चारच गाड्या आल्या होत्या. तसेच, खरेदीदारही नसल्यामुळे बाजारात शुकशुकाट पहायला मिळाला. खरेदीदार नसल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात माल पडून होता. तर, दुसरीकडे किरकोळ बाजारात भाजीपाला पोहोचू न शकल्याने बाजारात असलेल्या भाजीपाल्याचे दर वाढलेले पाहायला मिळाले. प्रत्येक भाज्या २० ते ३० रुपये पाव किलो या दराने विकल्या जात होत्या. घाऊक बाजारात भेंडी २५ ते २८ रु किलो, फ्लॉवर १० ते १२, गवार २५ ते ३०, घेवडा २५ ते ३० रु किलो, कारली २० ते २८, कोबी आठ ते १० रुपये किलो, शिराळी दोडकी २४ ते २६, टोमॅटो १४ ते १८ रुपये किलो, वांगी १२ ते १४, मिरची ३२ ते ३७ रु किलो, तोंडली २४ ते २८ रु किलो या दराने होती. मात्र किरकोळ बाजारात या सर्व भाज्या ७० ते ८० रुपये किलो दरानेच विकल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *