कोथिंबीर घ्यायला थांबला नि ३.५ लाख गमावले!

शहरातील गजबजलेल्या मारुती मंदिर परिसरात दुचाकीच्या डिकीतून साडेतीन लाखांची रोकड तीन चोरट्यांनी लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना जवळच्याच कापड दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याआधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

रत्नागिरीतील आंब्याचे व्यापारी काका मुळे यांची ही रक्कम होती. मुळे यांनी त्यांचा कर्मचारी जगन्नाथ सीताराम जंगम याला साडेतीन लाख रुपयांचा धनादेश देऊन आयसीआयसीआय बँकेत पाठवले होते. सकाळी ११च्या सुमारास हा धनादेश जमा करून जंगमने साडेतीन लाखांची रोकड घेतली व दुचाकीच्या डिकीत ठेऊन तो गोडबोले स्टॉपपासून मारुती मंदिरापर्यंत आला. कोथिंबीर घ्यायची असल्याने तिथे दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून तो भाजीविक्रेत्याकडे गेला. अवघ्या काही वेळातच जंगम परत दुचाकीपाशी आला पण डिकी उघडी असल्याचे पाहून त्याला धक्काच बसला. जंगम दुचाकीची चावी तशीच ठेऊन कोथिंबीर आणायला गेला होता. त्यामुळेच पाळतीवर असलेल्या चोरट्यांनी संधी साधली व डिकीतील रोकड लुटून पोबारा केला.

याबाबत तातडीने पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिथून जवळच असलेल्या कापड दुकानाबाहेरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला आहे. ते फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून गाड्यांची झडती घेण्यात येत आहे मात्र अद्याप चोरटे हाती लागलेले नाहीत. पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी तपासात जातीने लक्ष घातले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *