मुंबईकरांचे हाल, पश्चिम रेल्वेनंतर मध्य रेल्वेही मंदावली

अंधेरी स्थानकातील रेल्वे रुळावर पादचारी पुलाचा भाग कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दुसरीकडे मध्य रेल्वेची वाहतूकही मंदावली आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या सायन स्थानकाजवळ रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे. डोंबिवली आणि ठाणे स्थानकादरम्यानही लोकलसेवा उशिराने सुरू आहे. परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 30 मिनिटं उशीराने सुरू आहे. कसारा-आसनगाव येथून येणाऱ्या गाड्यांनाही विलंब होत आहे. जर पावसाचा जोर कमी झाला नाही तर मध्य रेल्वेही ठप्प होण्याची शक्यता आहे. एकंदरीत सकाळीच कामानिमित्त पडणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अंधेरीत पुलाचा मोठा भाग रेल्वे रुळांवर पडल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत होण्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाहतूक सुरळीत होण्यास अद्याप 4 ते 5 तास लागू शकतात असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या अपघातामुळे अंधेरी ते बोरिवलीपर्यंत लोकल ट्रेनच्या रांगा लागल्या आहेत. या घटनेत दोन पादचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.  सकाळी साडे सातच्या सुमारास ही घटना घडली. एनडीआरएफ, अग्निशमन दल व पोलिसांची पथकं घटनास्थळी पोहोचली असून मदत व बचावकार्य हाती घेण्यात आलं आहे. या अपघातामुळं पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *