भारत आता सर्वाधिक गरिबांचा देश राहिला नाही

तुम्हाला ही बातमी वाचण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळात देशातील अनेक लोक दारिद्र्य रेषेतून बाहेर पडलेले असतील. एका सर्व्हेनुसार भारतात गरिबीचं प्रमाण झपाट्यानं घटत असून दर ४४ मिनिटाला काही भारतीय दारिद्रय रेषेतून बाहेर पडत असल्याचं आढळून आलं आहे. भारतात अत्यंत वेगानं गरिबीचं प्रमाण घटत असल्यानं भारत आता सर्वाधिक गरिबांची लोकसंख्या असलेला देश राहिला नसल्याचंही या सर्व्हेक्षणात स्पष्ट करण्यात आलं आहे.

ब्रुकिंग्सच्या ‘फ्युचर डेव्हल्पमेंट ब्लॉग’मध्ये एक अभ्यास अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार भारतात गरिबी घटण्याचं प्रमाण वेगानं वाढल्याचं दिसून आलं आहे. दारिद्र्य घटण्याचं हे प्रमाण असंच सुरू राहिलं तर भारत लवकरच सर्वाधिक गरिबांची लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येईल. आतापर्यंत भारत या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र भारतातील गरिबी घटण्याचं प्रमाण वाढल्यानं सध्या भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला असून नायजेरियानं पहिलं स्थान पटकावलं आहे. तर डेमोक्रॅटीक रिपब्लिक कांगो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ज्या लोकांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी दिवसाला १२५ रुपयेही मिळत नाहीत, असे लोक दारिद्र्य रेषेत येतात, असं या अहवालात म्हटलं आहे. या अभ्यास अहवालानुसार २०२२ पर्यंत ३ टक्क्यापेक्षा कमी भारतीय गरीब असतील. तर २०३० पर्यंत भारतात अती दारिद्र्य रेषेखाली एकही व्यक्ती राहणार नाही.

आर्थिक विकास दर वाढला म्हणून…

भारताच्या विकासाचा आर्थिक दर वाढल्याने भारताला गरिबीवर मात करता आल्याचं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे. १९९१ मध्ये झालेल्या आर्थिक सुधारणेमुळेच आज गरिबी दूर झाल्याचं आपल्याला पाह्यला मिळतं, असं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसीचे प्राध्यापक एन. आर. भानुमूर्ती यांनी सांगितलं. २०३० पर्यंत भारत दारिद्र्य रेषेतून बाहेर पडेल. त्यासाठी भारताला ७ ते ८ टक्के विकास दर ठेवावा लागणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश, फिलिपाइन्स, चीन आणि पाकिस्तानमधील प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नात वेगाने वाढ झाल्याने दक्षिण आशिया, पूर्व आशियामध्ये वेगाने गरिबी दूर होत असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

>> मे २०१८ पर्यंत भारतात ७ कोटी ३० लाख लोक अति दारिद्र्य रेषेखाली आहेत. तर नायजेरियात ८ कोटी ७० लाख लोक अती दारिद्रय रेषेखाली आहेत.

>> नायजेरियात प्रत्येक ६ मिनिटाला लोक दारिद्र्य रेषेखाली येत आहेत. तर भारतात हा वेग मंदावला आहे.

>> जागतिक बँकेनुसार २००४ ते २०११ दरम्यान भारतात एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात गरिबीचे प्रमाण घटले आहे. हे प्रणाण ३८.९ टक्क्यावरून २१.२ टक्क्यांवर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *