मृत व्यक्ती सरणावरून उठून पाणी प्यायली!

 मरण हे आजवर कोणालाच चुकलेलं नाही. मृत्यू अटळ आहे असं म्हणतात. परंतु एक व्यक्ती चक्क सरणावरून मरणाच्या दारातून परत आल्याची घटना मध्य प्रदेशातील भोपाळ येथे घडली आहे. ४५ वर्षीय राजेश  उर्फ टिल्लू कोल असे या व्यक्तीचे नाव आहे.

अति दारू प्यायल्याने राजेश यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर राजेश यांना शनिवारी श्वसनाचा त्रास होऊ लागला. पहाटे सहा वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. राजेशचे नातेवाईक त्यांचा मृतदेह घरी घेऊन आले. त्यांच्या अंतसंस्काराची तयारी सुरू झाली. त्याची अंत्ययात्रा स्मशानभूमीत ११ वाजेच्या सुमारास पोहोचली.

राजेश यांचा मृतदेह चितेवर ठेवण्यात आला. मंत्रोच्चार सुरू झाले. राजेश यांचा मोठा मुलगा त्यांच्या चितेला अग्नी देणार इतक्यात राजेश यांच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष गेले. अचानक राजेश खोकू लागले. हे पाहून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सरणावरून उचलले आणि जवळच्या एका बाकावर ठेवले. राजेश यांना प्यायला पाणी देण्यात आले. ते अर्धा ग्लास पाणी प्यायले. परंतु त्यांचे अर्धे शरीर हालत नव्हते. पाणी प्यायल्यानंतर ते काही वेळ तसेच बसून होते. त्यांच्या शरीरात उष्णताही जाणवत होती. त्यांना परत रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांचा ईसीजी काढला आणि त्यांना देखरेखीखाली ठेवले. परंतु अर्ध्या तासानंतर त्यांना डॉक्टरांनी पुन्हा एकदा मृत घोषित केले.

पोस्टमॉर्टेमनंतर राजेश यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. आता मात्र राजेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घडलेल्या चमत्कारामुळे कुटुंबीयांना राजेश यांच्या जगण्याची आशा होती. परंतु ही आशा अर्ध्या तासातच विरून गेली. राजेश हे एका दुधाच्या डेरीत काम करायचे. ते पत्नी व दोन मुलांसह राहत होते. चमत्कार झाला परंतु राजेश यांना अखेर मृत्यूने गाठलेच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *