भाजीपाल्याचे दर कडाडले

गेल्या आठवड्यात जोरदार वारे वाहत असल्यामुळे भाजीपाल्याचे विशेषतः वेलवर्गीय भाजीपाल्याची फुल गळ मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. त्यात वाढलेल्या प्रचंड उष्णतेमुळे शेडनेटमधील भाजीपाल्यावरही विपरित परिणाम झाल्याने आवक कमी होऊ लागली आहे. परपेठेतून मागणी वाढल्याने सध्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याच्या लिलावात दर वाढले आहेत. खरिपाच्या हंगामात होणारी लागवड आणि त्यानंतर निघणारा भाजीपाला या किमान दोन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता असल्यामुळे भाजीपाल्याचे दर आणखी कडाडण्याची शक्यता बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

उन्हाळ्यात भाजीपाल्याचे दर स्थिर राहिले होते. सिंचनाची सुविधा असणाऱ्या भागातून चांगल्या प्रमाणात भाजीपाला विक्रीस येत होता. मात्र, मुंबई आणि गुजरातला जाणाऱ्या भाजीपाल्यास स्थानिक भाजीपाल्याशी स्पर्धा होत असल्याने नाशिकच्या भाजीपाल्याचे दर फारसे वाढले नाहीत. मुंबईला झालेल्या जोरदार पावसानंतर नाशिकच्या भाजीपाल्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे दरात वाढ होऊ लागली आहे.

गेल्या आठवड्यात नाशिक जिल्हा परिसरात जोरदार वारा सुटला होता. त्या वाऱ्यामुळे कारली, काकडी, दोडके, गिलके, भोपळा या वेलवर्गीय पिकांची फुल गळ वाढली. त्याचा परिणाम आता जाणवू लागला आहे. त्यामुळे त्यांचे उत्पादन घटू लागले आहे. शेडनेटमधील भाजीपाल्याला उष्ण वातावरणाचा फटका बसल्यामुळे ढोबळी मिरची सारख्या पिकांची आवक घटली आहे. त्यामुळेच ढोबळी मिरचीचे दर प्रति किलो ६० रुपयांपेक्षा जास्त झालेले आहेत. दोडक्याचे दरही ६० रुपये प्रतिकिलो असे झालेले आहेत. हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्यामुळे भाजीपाल्याच्या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *