दरवर्षी १० लाख लोकांना मेंदू कर्करोग

देशात प्रत्येकी १०पैकी एक भारतीय वयाच्या ७५पर्यंत कर्करोगाच्या उंबरठ्यावर पोहोचतो. दरशेकडा ७ जण याच कारणाने मृत्युमुखीही पडतात. विशेष म्हणजे, कर्करोगाच्या एकूण प्रकारांमध्ये ३३ टक्के लोकांना घसा, मान आणि डोक्याचा कर्करोग अकाली कवेत घेतो, अशी माहिती मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी येथे दिली.

जून महिन्याचा दुसरा आठवडा जगभर ब्रेनट्युमर सप्ताह म्हणून पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर, साधलेल्या संवादात डॉ. मेश्राम यांनी ही माहिती दिली. लहान मुलांमध्ये प्रामुख्याने ग्रुप थ्री मेड्युलोब्लास्टोमा हा ट्युमर आढळतो, असे नमूद करीत डॉ. मेश्राम म्हणाले, अमेरिकेत दरवर्षी किमान चारशे मुलांमध्ये हा कर्करोग आढळतो. अन्य देशांमध्ये हे प्रमाण दोनशे ते तीनशेच्या घरात आहे. मेंदूतील शस्त्रक्रियेसाठी कवटी उघडणे किंवा छेद घेणे, अशा शस्त्रक्रिया पूर्वी कराव्या लागत होत्या. परंतु, आता कवटीला कसलाही धक्का न लावता मेंदूमधील शस्त्रक्रिया करण्याची सुविधा आहे. अशा ९९ टक्के शस्त्रक्रिया यशस्वी होतात. रेडिएशनच्या साहाय्याने कवटी न उघडता शस्त्रक्रिया करता येते. विशेषतः ब्रेन ट्युमर व इतर आजारांसाठी एक्स-नाइफ मशिनद्वारे रेडिओ सर्जरी शक्य आहे. ब्रेनट्युमर ३ ते १५ वयोगटात किंवा वयाच्या पन्नाशीनंतर विकसित होत आहे. ब्रेन ट्युमरचे प्रमाण जगभर वाढत आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये त्याचे प्रमाण चिंताजनक आहे. जगात दरवर्षी किमान दोन लाख मुले ब्रेन ट्युमरच्या विळख्यात अडकतात.

हा धागा पकडत कर्करोगाच्या वाढत्या विळख्याबाबत डॉ. सुशील मानधनिया म्हणाले, नागपुरात खर्रा खाण्याच्या व्यसनामुळे हेड अँड नेक कर्करोगाचे प्रमाण धोकादायकरितीने वाढत आहे. यात प्रामुख्याने जीभ, गाल, जबडा, टाळू, कण्ठग्रंथी, थॉयराइड, स्वरयंत्र आदी प्रकार यात मोडतात. यांत जीव वाचण्याचे प्रमाण केवळ ५० टक्के आहे. याचाच अर्थ निदान झालेले ५० टक्के रुग्ण पाच वर्षांच्या आत मृत्युमुखी पडतात. आधुनिक युगात हृदयरोग आणि मधुमेहाला मागे पछाडत कर्करोगाने मृत्यूच्या शर्यतीत पहिले स्थान मिळविले आहे, तर दुसरीकडे खर्रा राजधानी ठरत असलेल्या नागपुरात घसा आणि कर्करोगाचे प्रमाण ३३ टक्क्यांपर्यंत गेल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *