ट्रेन रद्द झाल्यास ‘रिफंड’ची काळजी नको!

ट्रेन रद्द झाल्यास ‘रिफंड’ची काळजी नको!

तुम्ही लांबच्या प्रवासासाठी ई-तिकीट काढलंय, ते कन्फर्मही आहे, पण अतिवृष्टीमुळे किंवा एखाद्या अपघातामुळे तुमची गाडीच रद्द झाली, तर तिकिटाचे पैसे परत मिळवण्यासाठी आता तुम्हाला कुठलीही लिखापढी करावी लागणार नाही. तुमचे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. रेल्वे प्रशासनानं ही सुविधा सुरू केल्यानं ई-तिकीट काढणं आणखी फायद्याचं ठरणार आहे.

हल्ली, गावी जाण्यासाठी किंवा एखाद्या कामानिमित्त परराज्यात जाण्यासाठी ट्रेनचं कन्फर्म रिझर्व्हेशन मिळणं, यासारखा दुसरा आनंद नाही. आरएसी मिळालं तरी आपण सुखावतो. पण, तिकीट कन्फर्म असताना आपली गाडीच रद्द झाली तर?… रेल्वेच्या नावानं दोन शिव्या हासडून, नशिबाला दोष देत, कपाळावर हात मारून घेण्यावाचून आपल्याकडे काहीच पर्याय नसतो. बरं, हा अध्याय इथेच संपत नाही. या तिकिटासाठी दिलेले आपले हक्काचे पैसे परत मिळवण्यासाठी फॉर्म भरणं जास्तच वैतागवाडी असतं.

परंतु आता, ई-तिकीट काढणाऱ्यांना तिकिटाचे पैसे परत मिळवण्यासाठी काहीही करावं लागणार नाहीए. ई-तिकीट कन्फर्म न झाल्यास ज्याप्रमाणे तुमचे पैसे बँक खात्यात जमा होतात, तसेच आता ट्रेन रद्द झाल्यानंतरही ‘रिफंड’ थेट बँकेत जमा केला जाणार आहे. बरेच दिवस हा प्रस्ताव रेल्वेच्या विचाराधीन होता. त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. या सुविधेमुळे पावसाळ्यात अनेक प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *