आयएनएसव्ही तारीणी या जहाजातून जगसफरीवर गेलेल्या नौदलाच्या महिला नौसैनिकांचं पथक आज गोव्यात परततंय. आठ महिन्यांच्या खडतर जगप्रवासानंतर तारीणी परतत आहेत. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण तरीणीचं स्वागत करतील. गेल्यावर्षी १० सप्टेंबर या दिवशी या पथकाने जगप्रवासाला सुरूवात केली. नाविका सागर परिक्रमा या नावाने सुरू झालेली ही मोहीम लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. जहाजाच्या सहाय्याने पृथ्वीप्रदक्षिणा करणारं महिलांचं हे पहिलंच पथक.
सहा ठिकाणी थांबे
लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर स्वाती पी, लेफ्टनंट ऐश्वर्या बोड्डापती, एस विजया देवी आणि पायल गुप्ता यांचा या चमूत समावेश आहे. ऑस्ट्रेलियात फ्रीमँटल, न्यूझीलंडचं लीटलटन, फॉकलंड बेटांवर पोर्ट स्टॅनले, दक्षिण आफ्रिकेत केप टाऊन आणि मॉरिशन या सहा ठिकाणी तारीणी जहाजाने थांबे घेतले. तब्बल २१हजार ६०० नॉटीकल मैलांचं अंतर संपूर्ण भारतीय बनावटीच्या तारीणी या जहाजातून या चमूने पार पाडलं.
