वाराणसी येथील कॅन्टॉनमेन्ट रेल्वे स्थानकाजवळ नवीन उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू असताना, मंगळवारी त्याचा एक खांब कोसळल्यानं 19 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात काही वाहनं दबली. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख व गंभीर जखमींना 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.
दरम्यान, याप्रकरणी चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यात प्रकल्प अधिकाऱ्याचाही समावेश आहे. उत्तर प्रदेश स्टेट ब्रिज कॉर्पोरेशनकडून या पुलाचं बांधकाम सुरू होते.
मध्यरात्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळाला भेट दिली. जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाला युद्धपातळीवर मदत देण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.
