पोलिसांना सापडेनात गांजाविक्रेते

गांजासह अंमली पदार्थांची राजरोस विक्री सुरू असल्याने तरुणाई नशेच्या विळख्यात अडकत आहे. गेल्या अडीच महिन्यात पोलिसांनी गांजा ओढणाऱ्या ३९ जणांना ताब्यात घेऊन कारवाई केली. त्यांच्याकडील गांजाही पोलिसांनी जप्त केला. या कारवाईनंतर गांजा विक्रेत्यांपर्यंत पोलिस पोहोचतील असे वाटत होते, मात्र अडीच महिन्यात एकही गांजा विक्रेता पोलिसांच्या हाती लागला नाही. गांजा विक्रीच्या मुळाशी जाण्यात पोलिसांना यश येत नसल्याने विक्रेते मोकाट आहेत.

शहरासह जिल्ह्यात रोज लाखो रुपयांच्या गांजाची विक्री होते. इतर अंमली पदार्थांच्या तुलनेत गांजाची सहज उपलब्धता असल्याने तरुणाईला गांजाच्या नशेची चटक लागली आहे. शहरात आठ ते दहा विक्रेते रोज गांजाची विक्री करतात. पोलिसांकडून झालेल्या दुर्लक्षामुळे गांजा विक्रेत्यांनी थेट सार्वजनिक ठिकाणीही खुलेआम विक्री सुरू केली.  गेल्या आठवड्यात गांजा ओढणाऱ्या २८ जणांना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली, तर गेल्या अडीच महिन्यांत ३९ जणांवर कारवाई केली. गांजा ओढणारे पोलिसांच्या हाती लागले, मात्र गांजा विकणारे का सापडत नाहीत? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

गांजाची नशा करणाऱ्या तरुणांच्या चौकशीतून विक्रेत्यांची नावे पोलिसांना मिळणे अवघड नाही. गांजा विक्रीचे समूळ उच्चाटन करण्याची मानसिकता असेल तर, पोलिसांसाठी हे केवळ चार दिवसांचे काम आहे. थेट विक्रेत्यांना ताब्यात घेऊन जिल्ह्यात गांजा पुरवणाऱ्या तस्करांपर्यंत पोहोचता येते. तस्करांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यास गांजा विक्री रोखणे शक्य होणार आहे. विक्रेत्यांना पोलिसांचेच अभय असल्याची चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षात केवळ गांजा ओढणाऱ्यांनाच पोलिसांनी लक्ष करून विक्रेत्यांना मोकाट सोडल्याची स्थिती सध्या तरी दिसत आहे. अडीच महिन्यांत एकही विक्रेता सापडत नसल्याने ही शंका बळावली आहे. पोलिसांनी केवळ दिखाऊ कारवाई केल्यास गांजा विक्रीचे रॅकेट कधीच थांबणार नाही. परिणामी गांजातस्कर आणि विक्रेत्यांचे फावणार आहे. गांजा विक्रेत्यांना अभय देण्यापेक्षा त्यांच्यावर कायद्याची दहशत निर्माण करून पोलिसांनी तरुणाईला नशेच्या आहारी जाण्यापासून वेळीच रोखण्याची गरज निर्माण झाली आहे, अन्यथा कोल्हापूरचा ‘उडता पंजाब’ होण्यास वेळ लागणार नाही हे नक्की.

तरुणाईला गांजाचा विळखा

शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या पथकाने शहरातील छापेमारी करून गांजा ओढणाऱ्या ३९ संशयितांना पकडले. यातील बहुतांश २० ते ३० या वयोगटातील तरुण आहेत. आकर्षण आणि तात्पुरती मौज करण्याच्या हेतून याची सुरुवात होते. मात्र, हे थांब‌णे हाताबाहेर जाते. नशेच्या आहारी गेलेले अनेक तरुण यातून बाहेर पडण्यासाठी व्यसनमुक्ती उपचार केंद्रांचा आधार घेत आहेत. तरुणाईला या मार्गावर जाण्यापासून रोखण्यासाठी थेट गांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *